क्रीडा क्षेत्रातील आर्थिकता, स्थैर्य आणि बदल
भाग-4
ऑलिंपिक स्पर्धेतील भारतीय खेळाडूंच्या मैदानी स्पर्धेतील कामगिरीत कधी सुधारणा होणार हा आता मुख्य प्रश्न बनला आहे. खरेतर मदर ऑफ ऑल स्पोर्टस अशी मैदानी स्पर्धेची ओळख आहे, मात्र भारतीय खेळाडूंची या क्षेत्रातील कामगिरी कुठेच उठून दिसत नाही ही वस्तुस्थिती आहे. या क्रीडाप्रकारातील पदकांचा दुष्काळ कधी संपणार हे प्रश्नचिन्ह कायम आहे.
पुढील वर्षी जपानच्या टोकीयो या शहरात ऑलिंपिक स्पर्धा होत असून त्यात भारतीय खेळाडू कशी कामगिरी करतात याकडे क्रीडा समीक्षक तसेच चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. 1900 साली नॉर्मन पिचर्ड याने भारताचे प्रतिनिधित्व करताना मैदानी स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई केली होती, मात्र त्यावेळी देश स्वतंत्र झालेला नव्हता त्यामुळे या पदकाला देशाचे पदक म्हणता येणार नाही. पिचर्डने 200 मिटर आणि 200 मिटर अडथळ्याच्या शर्यतीत पदक जिंकले होते. हेच देशाचे पहिले व आजवरचे मैदानी स्पर्धेतील पदक ठरते. त्यानंतर एकदम 2003 साली अंजु बॉबी जॉर्ज हिने आयएएएफ जागतिक विजेतेपद स्पर्धेत पदक प्राप्त केले होते, मात्र तिला देखील ऑलिंपिकमध्ये पदक मिळविण्यात अपयशच आले. तिच्याही पुर्वी पायोली एक्सप्रेस पी. टी. उषा हिने जागतिक स्तरावर आपला ठसा उमटविला होता मात्र ऑलिंपिक पदकाने तिला देखील हुलकावणीच दिली आहे. अंजुने लांब उडी क्रीडा प्रकारात आंतरराष्ट्रीय स्तरावर 2003 साली 3 पदके आणि 2005 मध्ये 1 अशी चार पदके मिळविली मात्र तिला ऑलिंपिकमध्ये पदक मिळविण्यात अपयश आले. उषाने आशियाई तसेच आशियाई विजेतेपद स्पर्धेत पदकांची रास ओतली तरी देखील ऑलिंपिकचे पदक मिळविण्यात तिला देखील यश मिळाले नाही.
देशासाठी खेळणे आणि पदक मिळविणे हेच माझ्यासाठी महत्त्वाचे होते, कोणाला हरविण्यासाठी मी क्रीडा क्षेत्रात आले नाही असे उषा नेहमीच म्हणते. आशियाई स्तरावर सर्वात जास्त दबदबा असलेल्या उषाने या स्तरावर 18 सुवर्ण, 13 रौप्य आणि 3 ब्रॉंझ अशी एकूण 34 पदके मिळविली. 1982 साली आंतरराष्ट्रीय पातळीवर पदार्पण केलेल्या उषाने 1998 साली स्पर्धात्मक पातळीवरुन निवृत्ती पत्करली व एक प्रशिक्षक म्हणून पी. टी. उषाने स्कूल ऑफ अथलेटिक्स या अकादमीच्या माध्यमातून नवनवीन खेळाडू घडविण्यास सुरुवात केली. एक खेळाडूइतकेच यश तिला प्रशिक्षकाच्या भूमिकेतून मिळाले. आंतरराष्ट्रीय स्तरावर सलग सात सुवर्ण पदके मिळविणारी हिमा दास ही उषाच्याच अकादमीतून पुढे आली. ट्रॅक एंड फिल्डमध्ये उषाच्या नावाचा त्याकाळी इतका दबदबा होता की तिच्यापुढे अन्य खेळातील अगदी क्रिकेटमधील स्टार खेळाडू देखील नगण्य वाटत होते. मिल्खा सिंग, उषा व अंजू यांच्याबरोबरच सुरेश बाबु, गिता साथी, पी. के. प्रिया, सीमा पुनिया, प्रवीण कुमार, चित्रा सोमण, पिंकी प्रामाणीक, विकास गौडा, अश्विनी अकुंजी, मनदीप कौर आणि निरज चोप्रा यांनीही मैदानी स्पर्धेतील विविध क्रीडा प्रकारात यशस्वी कामगिरी केली मात्र यातील एकालाही ऑलिंपिकचे पदक मिळविण्यात आले नाही. त्यामुळे बघूया आता जपानमध्ये काही चमत्कार घडतो का.
सुविधांमुळे प्रगती
भारताबाबत बोलायचे झाले तर खेळाडू तयार होत नव्हते असे नाही पण त्यांना मोठ्या व्यासपीठावर आपली गुणवत्ता सिद्ध करण्यात अपयश येत होते, किंबहुना आजही येत आहे. ऑलिंपिक सोडा पण साधे राष्ट्रीय स्तरावर तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय खेळाडूंची कामगिरी नजरेत भरणारी कधी वाटलीच नाही. क्रीडा समीक्षकांनी परिस्थितीची माहिती घेण्याचेही कष्ट घेतले नाहीत व वारंवार खेळाडूंवर सातत्याने टीका करण्याचे धोरण अवलंबिले होते. त्याचवेळी देशात अनेक मोठ्या स्पर्धांचे आयोजन होत होते. परदेशी खेळाडू तसेच त्यांचे प्रशिक्षक यांनी फारशा सुविधा नसल्याबद्दल उघडपणे नाराजी व्यक्त केली होती, तरीही क्रीडामंत्रालय कोणतीही हालचाल करत नव्हते. देशातील केंद्रीय अंदाजपत्रकात देखील त्यावेळी कसलीच वाढ करण्यात आली नाही. परदेशातील सोयीसुविधा, प्रशिक्षकांचे तसेच खेळाडूंना मिळणाऱ्या सुविधांची निर्मिती आता गेल्या काही वर्षांपासून झपाट्याने निर्माण होत आहे. त्यामुळे अधिकाधिक मुले क्रीडा क्षेत्रातच कारकीर्द घडविण्याच्या स्वप्नाने विविध खेळात आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी पुढे येत आहेत. आधुनिक तसेच संगणकीय प्रणालीद्वारे अनेक खेळाडूंच्या कामगिरीचे विश्लेषण करता येऊ लागले व त्यांना योग्य ते सल्ले मिळायला लागले. यातूनच खेळाडूंची प्रगती होत आहे. आज विविध क्रीडा संघटनांमध्ये आलेले व्यावसायीकरण खेळाडूंच्या पथ्यावर पडताना दिसत आहे. केंद्र सरकारने गेल्या दोन वर्षांपासून ऑलिंपिक पोडीयम या उपक्रमांतर्गत नवनव्या खेळाडूंना मानधन, सोयीसुविधा तसेच उत्तम दर्जाचे साहित्य याबाबत खेळाडूंना कोणतीही तक्रार करण्याची संधी देऊ नये याकडे खरोखर गांभीर्याने पाहायला सुरुवात केली. आज या उपक्रमाचे संपूर्ण देशभर यशात रूपांतर होताना दिसते. क्रिकेटमध्ये जसा रांची सारख्या छोट्या शहरातून महेंद्रसिंग धोनी पुढे आला व त्याने जागतिक क्रिकेटमध्ये देशाचे नाव उंचावले त्याच धर्तीवर आता अनेक खेळाडू तळागाळातून पुढे येत आहेत. हिमा दास, साक्षी मलिक, दीपा मलिक, दत्तू भोकनळ असे अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली गुणवत्ता सिद्ध करताना दिसतात ही देशाच्या क्रीडा क्षेत्रातील प्रगतीसाठी खूपच महत्त्वाची बाब आहे.
स्टारडम आणि प्रसिद्धी
हॉकी, टेनिस, नेमबाजी, कुस्ती, बॅडमिंटन या क्रीडा प्रकारात आता अनेक खेळाडू स्टार बनले आहेत. सानिया मिर्झा, साईना नेहवाल, पी. व्ही. सिंधू यांच्याच पंक्तीत आता सेकंड बेंचही तयार होऊ लागला आहे. या खेळाडूंना जसे यश मिळाले त्या पाठोपाठ स्टारडम आणी प्रसिद्धीचे वलय देखील मिळाले आहे. पूर्वी केवळ क्रिकेटलाच प्राधान्य मिळते अशी तक्रार यायची मात्र या परिस्थितीत आश्चर्यकार बदल झाला. संघटनात्मक पातळीवर व्यावसायीकता वाढली आणि त्याचा लाभ संघटनांइतकाच खेळाडूंनाच होऊ लागला आहे. आता क्रिकेटपटूंप्रमाणेच अन्य खेळातील खेळाडूंच्या सरस कामगिरीला पाठिंबा देत प्रायोजकसुद्धा पुढे येत आहेत. आज भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या बरोबरीने सिंधूने यश, पैसा, पत, प्रतिष्ठा, मान मरातब मिळविले आहे. देशात आता महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन केले जात असल्याने देशातील खेळाडूंना परदेशी खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी मिळते. यातूनच त्यांना अनुभव मिळतो. मैदानी स्पर्धेच्या विविध क्रीडा प्रकारात सहभागी होत भारतीय खेळाडूवरच्या स्तरावर सातत्याने यश मिळविताना दिसतात. आयपीएलच्या धर्तीवर अन्य खेळांच्याही स्पर्धा होत असतात ही खरेच आनंदाची बाब आहे.
माध्यमांच्या भूमिकेतील सकारात्मक बदल
एक काळ होता की भारतात केवळ क्रिकेटच खेळले जाते अशी मानसिकता असल्यामुळे इतर खेळांकडे दुर्लक्ष होत होते. 2004 साली राजवर्धन राठोडने ऑलिंपिक पदक पटकावले आणि त्यानंतर देशातील माध्यमांचा अन्य क्रीडा प्रकाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. क्रिकेटच्या बातमीचे महत्त्व आहे मात्र आता अन्य खेळांबाबत बदल घडत आहेत. सिंधूची कामगिरी काय किंवा कोणा अन्य खेळाडूंबाबत माध्यमांमध्ये आता खूप बदल झाला आहे. पालकच मुलाला क्रीडा क्षेत्रातील कारकिर्दीसाठी प्रोत्साहन देत आहेत. प्रसिद्धी माध्यमांमधे देखील अन्य खेळांतील किमगिरीला प्राधान्य मिळू लागले आहे. राजकीय बातम्यांच्या बरोबरीने आता क्रीडा क्षेत्रातील अन्य खेळाडूंना देखील प्रसिद्धी मिळते हे देशात क्रीडा संस्कृती रुजविण्यासाठी पुरेसे आहे.
असो, भारतीय क्रीडा क्षेत्रातील व्यावसायीकता तसेच खेळाडूंवर असलेल्या अपेक्षा आता पूर्ण होतील हा विश्वास क्रीडा चाहत्यांना निश्चितच मिळाला आहे. ऑलिंपिकमध्ये भारतीय खेळाडूंना जास्तीतजास्त पदके कशी मिळतील व चीन आणि जपान या देशांना मागे टाकत पुढे कसे जाणार अशा प्रश्नांची सध्या चर्चा सुरू आहे. जपानमधील ऑलिंपिकद्वारे भारतीय क्षितिजावर पदक विजेत्या खेळाडूंचा खेळ बहरत आहे, त्यामुळे आता क्रीडा क्षेत्रात भारत जगातील तिसरी महासत्ता होईल असा विश्वास वाटतो. पाहुयात भारतीय क्रीडा क्षेत्रात उगवत्या सूर्याचे दर्शन होते का.
(समाप्त)
अमित डोंगरे