सुनीता शिंदे
झाला पाणउतारा की मारा दांडी
पंचायतीच्या मासिक सभेला उपस्थिती लावणाऱ्या अधिकाऱ्यांचा सदस्यांकडून पाणउतारा केला की, पुढच्या मासिक सभेला तो अधिकारी हमखास दांडी मारणार हे ठरलेले असतेच. मग त्याच्या बदल्यात दुसरा अधिकारी सभेला उपस्थिती लावतात. मात्र यामुळे तालुक्यातील अनेक प्रश्न पडून आहेत.
कराड – कराड पंचायत समितीची प्रत्येक महिन्यात मासिक सभा होते. या सभेत तालुक्यातील विविध विकासकामे तसेच रखडलेली कामे, नागरिकांच्या समस्या, विविध विभागांचे कामकाज यावर इत्यंभूत चर्चा होते. लोकांचे प्रतिनिधी म्हणून पंचायत समिती सदस्य अधिकाऱ्यांकडून त्याची माहिती घेत असतात.
मात्र सदस्यांकडून विचारण्यात येत असलेल्या उलटसुलट प्रश्नांना उत्तरे देण्यापेक्षा अनेकविभागाचे अधिकारी मासिक सभेस गैरहजर राहणे पसंत करतात. गेली अनेक वर्षे असाच प्रकार सुरू आहे. तक्रारी करूनही अधिकारी काहीतरी थातुरमातुर कारण देवून सभेस येणे टाळत असल्याचे सदस्यांचे म्हणणे आहे. विधानसभा निवडणुकीनंतर पंचायत समितीच्या होणारी मासिक सभा अत्यंत महत्त्वाची असून यावेळी तरी दांडीबहाद्दर अधिकारी उपस्थित राहणार का? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.
कराड तालुका पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र शासनाअंतर्गत 13 शासकीय विभाग आणि 12 इतर कार्यालये कराड तालुक्यामध्ये कार्यरत आहेत. 198 गावांचा तालुका असलेल्या या भागात 24 पंचायत समिती सदस्य आणि 12 जिल्हा परिषद सदस्य असे एकूण 36 सदस्य कार्यरत आहेत. या सदस्यांना तालुक्याच्या विकास कामांसाठी शासनाकडून निधी देण्यात येतो. या निधीमधून पंचायत समिती व जिल्हा परिषद विभागातील तालुका पातळीवरील अधिकाऱ्यांकडून मंजूर कामे केली जातात. ही कामे संबंधित अधिकाऱ्यांकडून वेळेवर केली जात नसल्याने सदस्यांकडून सभेदरम्यान अधिकाऱ्यांची कानउघडणी केली जात आहे.
हा सर्व प्रकार व तक्रारी टाळण्यासाठी अनेक अधिकारी पंचायत समितीच्या मासिक सभेलाच दांडी मारत असल्याचा आरोप प्रत्येक मासिक सभेत सदस्यांकडून केला जातो. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केली असता इतर मिटींगची थातुरमातूर कारणे दिली जातात. वास्तविक, पाहता अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे अनेक विषयांवर चर्चा होत नाहीत.
त्या विभागांच्या कामकाजाचा खुलासा होत नाही. प्रत्येक मासिक सभेला त्यांनी उपस्थित राहणे बंधनकारक असताना अनेकजण या नियमाला कलाटणी देतात. त्यांच्यावर कोणीही कारवाई करत नसल्याने गैरहजेरी लावणे त्यांनाही अंगवळणी पडले आहे. अधिकारीच उपस्थित नसतील तर तक्रारी करण्यात काय अर्थ, असा सवाल अनेक सदस्य करीत आहेत.