ना. डॉ. अतुल भोसले यांचा पूरग्रस्त गावांचा दौरा; भाजपतर्फे स्थलांतरितांना जेवण व आरोग्य सेवा
कराड – कराड तालुक्याला पुराचा विळखा वाढत चालला आहे. कराड दक्षिण मतदारसंघातील अनेक गावे पूरबाधित झाली असून, या गावातील लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. कराड तालुक्यात उद्भवलेली गंभीर पूरस्थिती हाताळण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाला (एनडीआरएफ) पाचारण करणार असल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष डॉ. अतुलबाबा भोसले यांनी दिली. त्यांनी आज कराड दक्षिणमधील पूरग्रस्त गावांचा दौरा केला, त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
ना. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी कराड दक्षिणमधील पोतले, आंबवडे, रेठरे बुद्रुक, रेठरे खुर्द, सैदापुर यासह पूरग्रस्त गावांचा दौरा केला. यावेळी त्यांच्यासमवेत तहसीलदार अमरदीप वाकडे आणि वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते. गावागावात ठिकठिकाणी पाणी शिरले आहे. अशा परिस्थितीत गावातील लोकांना धोका पोहचू नये यासाठी त्यांचे योग्य त्या ठिकाणी स्थलांतर करावे, तसेच त्यांना सर्व सेवासुविधा मिळतील याची काळजी घ्यावी, अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.
दरम्यान, रेठरे खुर्द, आटके मळी या परिसरातील पूरग्रस्त नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले असून, त्यांची निवास व्यवस्था वाठार येथील दानशूर बंडो गोपाळ मुकादम विद्यालयात करण्यात आली आहे. याठिकाणी ना. डॉ. अतुल भोसले यांनी शासकीय अधिकाऱ्यांसमवेत भेट देऊन पूरबाधितांशी संवाद साधला. याठिकाणी स्थलांतर करण्यात आलेल्या नागरिकांना भारतीय जनता पार्टीतर्फे मोफत जेवणाची सोय करण्याची घोषणा त्यांनी केली. तसेच तालुक्यात पुरबाधित क्षेत्रात कृष्णा हॉस्पिटलच्या माध्यमातून प्रथमोपचार पेटी आणि अन्य वैद्यकीय सुविधा पुरविणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच कराड व पाटण तालुक्यातील भीषण पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाला (एनडीआरएफ) पाचारण करावे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच साथीचे आजार पसरू नयेत यासाठी योग्य ती काळजी घ्यावी आणि औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून ठेवावा, अशा सूचना आरोग्य विभागाला दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले.