उपमहापौरपदाच्या निवडणूकीत चुरस
औरंगाबाद: औरंगाबाद महापालिकेची निवडणूक अवघ्या चार महिन्यांवर आली असताना भाजपाच्या उपमहापौरांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता उपमहापौर पदासाठी निवडणूक घ्यावी लागणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र येणार की एमआयएम आणि भाजप एखाद्या पक्षाला उभा करून शिवसेनेला शह देणार याची चर्चा रंगली आहे.
औरंगाबाद पालिकेच्या उपमहापौर पदाचा भाजपाने राजीनामा दिला आणि पालिकेमध्ये असलेली शिवसेना-भाजपची युती तुटली. गेली सत्तावीस वर्षे सभागृहात शिवसेना-भाजपा एकत्र येऊन एमआयएम राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या समोर असायची. आता त्याच पालिकेच्या सभागृहात शिवसेना भाजपचे नगरसेवक एकमेकांच्या समोर आलेले पाहायला मिळाले आहे.
उपमहापौरपदाचा राजीनामा दिल्याने पालिकेची निवडणूक चार महिन्यांवर आली असताना उपमहापौरपदासाठी निवडणूक घ्यावी लागणार आहे. त्यामुळे सत्तेत असणारी शिवसेना उपमहापौरपदाच्या निवडणुकीमध्ये राज्यात नव्याने सत्तेत आलेल्या महाविकास आघाडीशी समीकरण करून निवडणूक लढवणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
शिवसेनेचा दावा आहे की, त्याच्याकडे 11 अपक्ष नगरसेवक आहेत. सेना 29, कॉंग्रेस 11, राष्ट्रवादी 4 असे पक्षीय बलाबल एकत्र आले तर महाविकास आघाडी काठावर पास होऊ शकते. पण इकडे एमआयएम आणि भाजप एखाद्या अपक्षला उभं करून सेनेला शह देण्याच्या तयारीत आहेत.