यवत – दौंड तालुक्यातील वाखारी येथे जेवण अजून का झाले नाही? असे विचारत पत्नीच्या पोटात चाकूने वार करीत खून केला. ही भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या मुलावर व शेजारील दोघांवरही पोटात चाकूने वार करीत या तिघांवर हल्ला करीत गंभीर जखमी करण्यात आले आहे.
याप्रकरणी यवत पोलिसांनी आरोपी फलके हक अब्दुल हक शेख (रा. वाखारी गायकवाड वस्ती, वाकडापूल, ता. दौंड; मूळगाव धानोरा म्हाली, ता. चांदुर रेल्वे, जि. अमरावती) यास ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. ही घटना शनिवारी (दि. 9) रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडली.
या घटनेत शालू गजानन राजनहिरे (वय 45) यांचा मृत्यू झाला असून देवानंद गजानन राजनहिरे (मुलगा) व शेजारी राहणारे केशव मुरलीधर मोरे व त्यांची पत्नी विजया केशव मोरे यांच्यावरही चाकूने पोटात वार केल्याने हे तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
देवानंद राजनहिरे याने यवत पोलीस ठाण्यात आरोपी वडीलाविरोधात फिर्याद दिली असून यवत पोलिसांनी आरोपी यास शिताफीने ताब्यात घेत अटक केली असून त्याच्या विरोधात खून करणे, खुनाचा प्रयत्न करणे यासह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करीत अटक केली आहे.