टाकवे बुद्रुक – माणसाच्या आयुष्यात कधी कुठल्या वळणावर नियतीच्या खेळाने माणूस कधी रस्त्यावर येईल, याचा काही नेम सांगता येत नाही. अशी एक घटना एका कुटुंबासोबत घडली आहे. यामध्ये एका त्रिकोणी कुटुंबाची वाताहत झाल्याने कर्ता पुरूष असलेल्या वृद्धाला आयुष्याच्या सायंकाळसाठी मावळ तालुक्यातील किनारा वृद्धाश्रमाचा आसरा घेण्याची वेळ आली आहे.
पुण्यातील कर्वेनगर भागात राहणारे दिलीप जोशी यांची ही कैफियत आहे. पती, पत्नी व एकच मुलगा असे त्रिकोणी कुटुंब असलेल्या दिलीप जोशी यांचे सारे आयुष्य पुण्यातील कर्वेनगर या परिसरात गेले. 2000 साली दिलीप जोशी यांना स्लिप डिस्क (पाठदुखी)हा आजार जडला, व्याधीने जोर पकडला. यादरम्यान त्यांचा मुलगा बारावीत शिकत होता. मुलाला बरे-वाईट समजत होते.अशातच जोशी यांच्या पत्नीने 2003 साली अचानक दुसरे लग्न केले. समज आलेला मुलगा व पत्नीने अचानक दिलेल्या धोक्यामुळे जोशी डिप्रेशनमध्ये गेले. पत्नी निघून गेलेली, अशातच मुलानेही काही वर्षातच मग स्वतःचा मार्ग शोधला. प्रेमविवाह करत तोदेखील निघून गेला.
दोन्ही आधार संपल्याने परिस्थितीपुढे हार मानायची नाही, असे मनोमन ठरवत जोशी यांनी परिस्थितीला समोरे जाण्याचे ठरविले. पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांनी दिवसा पौरोहित्य व रात्री हॉटेलात वेटरची नोकरी असा दिनक्रम सुरू ठेवला. पोटची खळगी भरत असलेल्या असलेल्या जोशींना वाढत्या वयोमानानुसार वयाच्या 68 व्या ही कसरत करणे ही अवघड जायला लागले. त्यानंतर करोनामुळे हॉटेल्स बंद पडल्याने शेवटी नियतीपुढे हार मानत अखेर त्यांना वृद्धाश्रमाचा सहारा घ्यावा लागला. आंदर मावळातील कुसवली येथे सहारा वृद्धाश्रमात जोशी आता आपल्या आयुष्यातील आठवणी जपत आयुष्याच्या शेवटच्या वळणावरती मिळालेल्या नवीन सवंगड्यांसमवेत सुखद आयुष्य जगत आहेत.