खडकवासला (विशाल भालेराव) –सिंहगड रस्त्यावर पुणे महानगर पालिका 117 कोटी रुपये खर्च करून उड्डाणपूल उभारत आहे. पुण्याकडे जाताना हा उड्डाणपूल फन टाइम थिएटर जवळील खाऊ गल्ली पासून सुरू होतो. परंतु, पूल सलग राजाराम पुलापर्यंत ऐवजी विश्रांती नगर पेट्रोल पंप समोर उतरविला गेला आहे व पुन्हा तो राजाराम ब्रिजपासून सुरू होऊन शारदा मठापर्यंत गेलेला आहे. यातून वाहतूक कोंडीतून सुटका होणार की आणखी वाढणार? हा प्रश्न यातून निर्माण होत आहे.
कर्वे रस्त्यावरील दुहेरी उड्डाणपूल असून देखील रस्ता अरुंद ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. सिंहगड रस्त्यावर विश्रांती नगर या ठिकाणी उड्डाणपूल खाली उतरवला जाणार आहे, त्या ठिकाणी रस्ता अरुंद होऊन असल्याने तेथे वाहतूक कोंडीची समस्या कायम राहणार आहे. त्यामुळे उड्डाणपूल सलग राजाराम पुलांपर्यंत व्हावा, अशी मागणी लोकप्रतिनिधी व नागरिकांकडून महापालिकेने करण्यात आली. परंतु, हा उड्डाणपूल कमी खर्चात करता येईल, सलग करण्याची गरज नाही, अशी बाळबोध उत्तरो पालिकेचे प्रकल्प अधिकारी देत आहेत. या प्रकल्पाबाबतच नागरिकांमध्ये साशंकता आहे.
हा उड्डाणपूल सलग दोन किलोमीटर असताना 1.1 किलोमीटर प्रत्यक्षामध्ये आहे. ज्यामध्ये दोन सिग्नल फक्त लोकांना उड्डाणपुलावरून पुढे जाण्यासाठी मदत होणार आहे त्या ठिकाणी विश्रांतीनगर मध्ये खाली उतरवला जाणार त्या ठिकाणी पुन्हा अरुंद रस्त्यावर वाहतूक कोंडी होणार आहे त्यामुळे उड्डाणपूल राजाराम पुलापर्यंत सलग करण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष वसंत मोरे, विजय मते, बाळासाहेब मंडलिक, हनुमंत चव्हाण यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांकडे केली आहे.
सिंहगड रस्त्यावर मोठे गृहप्रकल्प व रहिवासी भाग असल्याकारणाने या ठिकाणी होणारा उड्डाणपूल व भविष्यात येणारी मेट्रो या दोन्ही गोष्टी वाहतुकीची होणारी प्रचंड कोंडी फोडण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. यासाठी प्रस्तावित उड्डाणपूल सलग दोन किलोमीटर करणे गरजेचे ठरणार असल्याचे मनसेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.