कुकडी प्रकल्पात 40 टक्के पाणीसाठा शिल्लक
गेल्या वर्षीपेक्षा 8 टक्के जलसाठा अधिक
तीव्र उन्हाळ्यामुळे पाण्याचे नियोजन आवश्यक
रमेश जाधव
रांजणी – सध्या कुकडी प्रकल्पात पाण्याचा केवळ 40 टक्के साठा शिल्लक आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा प्रकल्पात 8 टक्के जलसाठा जास्त असला तरी प्रकल्पातील महत्त्वाचं धरण समजले जाणाऱ्या डिंभे धरणात पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाली असल्याने शेतीसह इतर उद्योग अडचणीत येण्याची शक्यता आहे. पावसाळा सुरू होण्यासाठी अद्यापही दोन महिन्यांचा अवधी असल्याने कुकडी प्रकल्पात असलेल्या पाण्याचे योग्य नियोजन झाले नाही पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे.
कुकडी प्रकल्पांतर्गत जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव जोगा, वडज, येडगाव आणि माणिकडोह ही धरणे असून आंबेगाव तालुक्यातील डिंभे या धरणांचा समावेश होतो. पुणे, अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यांतील सुमारे सात तालुक्यांना या पाण्याचा उपयोग होत आहे आणि दीड लाख हेक्टर क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्र सिंचनाखाली येत आहे.
कुकडी प्रकल्पात येणाऱ्या पाचही धरणात पाणी पातळीत घट झाली असून सध्या 11 हजार 882 दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असून, प्रकल्पात 40 टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी याच काळात प्रकल्पामध्ये 9 हजार 785 दशलक्ष घनफूट पाण्याचा साठा शिल्लक होता.
मार्च महिन्यात पाण्याची टंचाई भासू लागल्यामुळे लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांची पाण्याची मागणी जोर धरू लागल्याने प्रकल्पातून आवर्तन सुरू करण्यात आले असून 650 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. यात डाव्या कालव्यातून 500 क्युसेक आणि उजव्या कालव्यातून 150 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.
कुकडी प्रकल्पातून सध्या सध्या 650 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. अजून दोन महिने पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. शेतकन्यांनी देखील आगामी काळात पाण्याचा योग्य वापर करावा.
– प्रशांत कडुसकर,कार्यकारी अभियंता, कुकडी प्रकल्प कडा क्रं. 1