मंचर – गेली अनेक वर्षे बंद असलेल्या बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू झाल्या आहेत. बंदच्या काळात अनेक बैलगाडा मालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. आता तेच दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात येणार असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.
नागापूर येथील थापलिंग यात्रेत बैलगाडा शर्यतींना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भेट दिली, यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, भीमाशंकर कारखान्याचे संचालक प्रदीप वळसे पाटील उपस्थित होते. गेले अनेक वर्षे संघर्ष करत बैलगाडा मालकांनी न्यायालयीन लढाई जिंकली असली तरी बंदच्या काळात अनेक बैलगाडा मालकांवर स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले.
गेल्या अनेक वर्षांपासून दाखल गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन दिले गेले. मात्र, यावेळी वळसे पाटील यांच्यावर थेट गृहमंत्री पदाची जबाबदारी आली आहे, त्यामुळे बैलगाडा मालकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. यावेळी तरी दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत, अशी विनंती थापलिंगच्या यात्रेत मंचर बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम यांनी केली. त्यानुसार वळसे पाटील यांनी बैलगाडा मालकांवरील दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या असल्याचे सांगितले.
ज्या पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल झाले आहेत, त्या पोलीस ठाण्याकडून पोलीस अधीक्षकांना प्रस्ताव पाठवणे गरजेचे आहे. त्यानंतर संबधित प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे दाखल करावा लागणार आहे. त्यानंतर गृहमंत्र्याकडे प्रस्ताव जाईल. गृहमंत्री त्याला मान्यता देतील. तो प्रस्ताव न्यायालयात दाखल केल्यावर आणि त्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच दाखल गुन्हे मागे घेतले जातील, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.