पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – यावर्षीपासून इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा होत आहे. परंतु, या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना केवळ १० ग्रेस गुण दिले जाणार आहेत. इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना २० ग्रेस गुण दिले जातात. मग, पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना केवळ १० ग्रेस गुण का?, असा प्रश्न पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाने उपस्थित केला आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे ‘स्टार्स’ प्रकल्प नियतकालिक मूल्यांकन चाचणी (पॅट) संकलित मूल्यमापन दोन आणि इयत्ता पाचवी-आठवीसाठी वार्षिक परीक्षेचे आयोजन करण्यात येत आहे. परंतु, त्यावर मुख्याध्यापक संघाने प्रश्न उपस्थित केले आहेत. इयत्ता तिसरी ते आठवीच्या पॅट परीक्षा प्रथम भाषा, गणित आणि तृतीय भाषा या तीन विषयांत होणार आहेत.
या तीन विषयांचे पेपर शाळांना वितरित करण्यात येणार आहेत का? इयत्ता पाचवी आणि आठवी या दोनच इयत्तांच्या वार्षिक परीक्षा घ्यायच्या आहेत, की सर्व इयत्तांच्या परीक्षा घ्यायच्या? याबाबत खुलासा करण्यात यावा, अशी मागणी शाळा मुख्याध्यापक संघाने महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी पुणे जिल्हा शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष नंदकुमार सागर, सरचिटणीस प्रसाद गायकवाड, विद्या समितीचे अध्यक्ष तबाजी वागदरे, विद्या समिती सचिव भानुदास रिठे आदी उपस्थित होते.