– बाजारात सतत मंदी असतानाच्या काळात एसआयपी करणाऱ्यांनाही नुकसान होत असते. सध्या त्याचा अनुभव गुंतवणूकदार घेत आहेत.
– अर्थात, तेजी मंदीची ही आवर्तने बाजारात नेहमीच चालू असतात. ते बाजाराचे वैशिष्ट्येच आहे.
– बाजारात साधारणपणे ८ किंवा ९ वर्षांची तेजीमंदीची सायकल असते. यातील तीन वर्षे ही भरपूर फायदा मिळवून देणारी असतात.
– सुरवातीची तेजीची वर्षे आपल्या वाट्याला आली तर पुढे नुकसान होण्याचे प्रमाण कमी होते.
– मात्र पहिली तीन वर्षे मंदीची आली तर एसआयपी फायद्यात येण्यासाठी अधिक काळ वाट पहावी लागू शकते.
– बाजारात मंदीनंतर जेव्हा परत तेजी येते तेव्हा फायदासुद्धा जास्त होतो कारण आपण मंदीच्या काळात गुंतवणूक नियमित करत राहिल्यामुळे आपल्या खात्यात जास्त युनिट्स जमा झालेली असतात. तेजीच्या काळात एनएव्ही वाढल्याने आपली एसआयपी फायदा देणारी ठरते.
– म्युच्युअल फंडाच्या योजनेत तुम्ही सतत फायद्यातच आहात, असे कधीच होऊ शकत नाही, पण त्यातून तुम्हाला दीर्घ मुदतीत किमान १२ ते १५ टक्के वार्षिक दराने परतावा मिळू शकतो. इतका परतावा पोस्टाच्या किंवा बँकेच्या कोणत्याच योजनेत मिळू शकत नाही.
– याचा अर्थ असा की पुढील तीन चार वर्षे थांबण्याची तयारी असणाऱ्यांनी जरुर एसआयपी करावी आणि मंदीच्या काळात होणाऱ्या नुकसानाकडे दुर्लक्ष करावे.
– प्रश्नाचे उत्तर आहे, सध्या एसआयपीच्या गुंतवणुकीत फायदा दिसत नसला तरी एसआयपी बंद करू नका.
(एसआयपी म्हणजे म्युच्युअल फंडात दर महिन्याला आपल्या क्षमतेप्रमाणे विशिष्ट रक्कम भरत राहाणे. ही रक्कम थेट बँक खात्यातून दर महिन्याला विशिष्ट तारखेला जमा होण्याची सोय उपलब्ध असल्याने एकदा ती सोय केली की झाले.)