मुंबई : देशात करोनाची दुसरी लाट ओसरत नाही तोपर्यंत तिसरी लाट देखील येणार असल्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे. त्यामुळे यापुर्वी देशात लसीकरणाला वेग आला आहे. मात्र लसीच्या तुटवड्यामुळे अनेक लसीकरण केंद्र बंद पडले आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने केंद्र सरकारवर टीका करत आंदोलन केले आहे.
आज काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्वात मुंबईत आंदोलन सुरू आहे. या आंदोलनावर भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे. अतुल भातखळकर म्हणाले, “काँग्रेस नेते भाई जगताप लशींच्या मुद्यावर आंदोलन करत आहेत. सर्व बड्या रुग्णालयात लशी उपलब्ध आहेत, फक्त राज्य सरकारला मिळत नाहीत. १ मे पासून राज्यांना लस खरेदीची मुभा असताना लस खरेदी का झाली नाही, याचे उत्तर त्यांनी द्यावे. रुग्णालयाचा धंदा चालावा म्हणून ही दिरंगाई होतेय का?”
अतुल भातखळकर यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर देखील निशाणा साधला. “मंत्री बाळासाहेब थोरात आपल्या कारखान्यातील मजुरांच्या पगारातून लशीचे पैसे कापत आहेत. पण केंद्राने लशी फुकट द्याव्या, अशी त्यांची मागणी आहे. काँग्रेसचे घटिया चारित्र्य दाखवणारा हा प्रकार आहे. काँग्रेसवाल्यांचा निलाजरेपणा पाहा”, असे ट्वीट भातखळकर यांनी केले आहे.
लस उपलब्ध होत नसल्याने मुंबई महापालिकेप्रमाणे नवी मुंबई महापालिकेनेही लस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी काढलेल्या जागतिक निविदांना मुदतवाढ देऊनही काहीही प्रतिसाद मिळाला नाही. मुंबई पालिकेच्या निविदांना तरी काही कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे लस खरेदी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. पालिकेने दुसरी मुदतवाढ दिली आहे.