मुंबई – वादग्रस्त सरकारी अधिकारी समीर वानखेडे यांची सीबीआय चौकशी सुरु झाल्यापासून भाजप नेते त्यांचा बचाव करण्यासाठी सरसावले आहेत. समीर वानखेडे हे सरकारी अधिकारी असताना नागपुरमधील संघ मुख्यालयात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना भेटले व त्यानंतरच सीबीआय चौकशीचा ससेमिरा त्यांच्या मागे लागला आहे, हे संशयास्पद वाटते, असे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नाना पटोले म्हणाले, समीर वानखेडे सरसंघचालकांना भेटल्यानंतर त्यांची चौकशी सुरु होण्याची कारण काय? या प्रकरणात काही ना काही लपलेले असून काही तरी संशयास्पद आहे किंवा समीर वानखेडे यांच्याकडे काहीतरी अशी माहिती आहे. ज्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपची पोलखोल ते करु शकतात.
दुसरीकडे वानखेडे यांची सीबीआय चौकशी सुरु होताच महाराष्ट्रातील भाजपचे नेते, उपमुख्यमंत्री फडणवीस व इतर काही मंत्री वानखेडेंच्या केसाला धक्का लावला तर पाहून घेऊ, असे म्हणत आहेत. सीबीआय, ईडी या तपास यंत्रणा तर भाजप सरकारच्याच अखत्यारित आहेत.
मग वानखेडे यांच्या सीबीआय चौकशीचा भाजपला एवढा त्रास का होत आहे? सरकारी अधिकारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात जाणे यात काही ना काही लपलेले आहे, हा काही आरोप नाही तर असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
आघाडीतील जागावाटप मेरिटनुसार…
महाविकास आघाडीतील जागा वाटपावर विचारलेल्या प्रश्नावर पटाले म्हणाले, प्रत्येक पक्षाने चाचपणी केली पाहिजे, यात काही गैर नाही. पण जागावाटपाचा निर्णय हा मेरिटवरच होईल. कॉंग्रेस पक्षाने काही कमिट्या नेमलेल्या आहेत,
सर्व बाजूंचा विचार करुन जागा वाटप होईल. मेरिटवर निर्णय झाला तर अनावश्यक चर्चा थांबेल. महाराष्ट्र हा परंपरागत कॉंग्रसेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. कॉंग्रेसची भूमिका स्पष्ट असून भाजपाला पराभूत करणे यासाठी आमचे काम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.