नवी दिल्ली – देशात करोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम सुरु असून याद्वारे ११ कोटींहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. देशात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेत नागरिकांना लसीचे प्रत्येकी दोन डोस देण्याची योजना आहे.
पाहिला डोस घेतल्यानंतर ३० ते ४५ दिवसांनंतर दुसरा डोस घ्यावा लागतो. मात्र लसीचा दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या केवळ २ कोटी असल्याचं आकडेवारीतून समोर आलंय. नागरिकांच्या मनात लसीकरणाबाबत अनेक गैरसमज असल्यानेच ही आकडेवारी कमी असल्याचं बोललं जातंय. याच पार्श्वभूमीवर आरोग्य आणि विकास अर्थशास्त्रज्ञ प्रा. अनुप मलानी यांनी लसीबाबतच्या अनेक गैरसमजुती दूर केल्या आहेत.
लस घेतल्यानंतर करोनाची बाधा होत नाही?
“भारतात व जगातील इतर देशांमध्ये सध्याच्या घडीला हाच गैरसमज बळावला आहे. लस तुम्हाला विषाणूची बाधा होण्यापासून वाचवत नाही. रोगप्रतिकारकक्षमता अशा पद्धतीने काम करत नसते. याउलट तुमच्या शरीरातील नैसर्गिक व लसीमुळे निर्माण झालेली रोगप्रतिकारकक्षमता तुम्हाला विषाणूची बाधा झाल्यानंतर त्यातून लवकर बरं करण्यासाठी मदत करते.” असं मुलानी सांगतात.
लस घेतल्यानंतरही विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका असेल तर लस का घ्यायची?
“याचे दोन फायदे आहेत एकतर आपल्याला संसर्गामुळे मृत्यू किंवा आरोग्यास होणारी इतर गंभीर हानी टाळण्यास मदत होते. आणि दुसरे म्हणजे आपल्यामुळे इतरांना विषाणूचा संसर्ग होण्याची संभाव्यता कमी करण्यास मदत होते. त्यामुळे लसीकरणानंतर विषाणूचा संसर्ग होणे शक्य असले तरी तुम्हाला गंभीर हानी पोहचणार नाही” असं त्यांनी सांगितलं. लोकसंख्येतील पुन्हासंक्रमित होण्याचे प्रमाण संक्रमणाच्या व्यापकतेवर आणि नैसर्गिक किंवा लसीद्वारे निर्माण झालेल्या रोग प्रतिकारकक्षमतेच्या व्याप्तीवर अवलंबून असते अशी माहितीही मुलानी यांनी दिली.