नवी दिल्ली – जगातल्या अन्य देशांमध्ये करोनाचा प्रसार नियंत्रणात येत असताना भारतात मात्र करोनाचा प्रसार सुरूच असून त्याचा वेगही आता वाढला आहे. करोना रोखण्यात भारताला अपयश का आले याचा पंतप्रधानांनी खुलासा करावा अशी मागणी माजी अर्थमंत्री व ज्येष्ठ कॉंग्रेस नेते पी चिदंबरम यांनी केली आहे.
त्यांनी म्हटले आहे की 21 दिवसांत करोना नियंत्रणात आणू अशी घोषणा पंतप्रधानांनी केली होती. पण आज भारतातील करोनाच्या रुग्णांच्या संख्येने 40 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. भारतात करोना रोखण्यासाठी मोठा लॉकडाऊन करण्यात आला पण लॉकडाऊनचा लाभ न मिळालेला भारत हा जगातील एकमेव देश असावा अशी टिप्पणीही चिदंबरम यांनी केली आहे.
त्यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे की येत्या 30 सप्टेंबरपर्यंत देशातील करोना रुग्णांची संख्या 55 लाखांपर्यंत जाईल असे आपण म्हटले होते पण आपला तो अंदाज चुकीचा होता आता येत्या 30 सप्टेंबरपर्यंत करोनाग्रस्तांची संख्या 55 नव्हे तर 65 लाखांपर्यंत जाण्याची चिन्हे आहेत. देशातील खराब अर्थव्यवस्थेवरही चिदंबरम यांनी दुसऱ्या एका ट्विटर संदेशात टीका केली आहे.
त्यांनी म्हटले आहे की भारताचा विकासदर शून्याच्याही खाली म्हणजे निगेटिव्ह पातळीवर गेला आहे पण त्या विषयी अर्थमंत्रालयाने एका शब्दानेही आपली प्रतिक्रिया दिलेली नाही. नंतर मात्र त्यांनी पुन्हा आपल्या नेहमीच्या लोकांची दिशाभूल करण्याच्या शैलीत देशाच्या अर्थव्यवस्थेची व्ही शेप मध्ये रिकव्हरी होईल अशी थाप मारली आहे असेही चिदंबरम यांनी म्हटले आहे.