नवी दिल्ली – दोन वेळा ऑलिंपिकमध्ये पदक विजेता, तीनवेळा राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता, पद्मश्री, खेलरत्न, अर्जुन पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित असलेला पहिलवान सुशीलकुमारची काळी बाजू आता सर्वांच्यासमोर आलेली आहे.
कुस्तीने त्याला भरभरून दिले. देशात कुठल्याही पहिलवानाला मिळाला नव्हता एवढा पैसा, प्रसिद्धी, चाहत्यांचे भरभरून प्रेम त्याला मिळाले. मात्र सागर धनकड या युवा पहिलवानाच्या हत्येप्रकरणात सुशीलकुमारला अटक झाली आणि आता टॉवेलने तोंड झाकून फिरण्याची वेळ त्याच्यावर आली आहे.
दिल्ली पोलिसांनी अगदी सर्वसामान्य गुन्हेगाराप्रमाणे त्याला दिल्लीतील मिडिया आणि उत्तराखंडात तपासासाठी फिरवले. खून प्रकरणानंतर पोलिसांपासून पळण्याचा त्याने दोन आठवडे प्रयत्न केला. अखेर 23 मे 2021 रोजी पोलिसांनी त्याला पंजाबमधून अटक केली. 23 वर्षांच्या सागर धनकड या पहिलवानावर हल्ला करून त्याला बेदम मारहाण करून त्याचा खून केल्याचा आरोप सुशीलकुमारवर आहे.
यासंदर्भात आलेल्या बातम्यांवर विश्वास ठेवला तर स्वतःची दहशत निर्माण व्हावी म्हणून सागरला केलेल्या मारहाणीचा व्हिडिओदेखील बनवलेला आहे. गुन्हेगारीचा मार्ग निवडणारा सुशीलकुमार हा काही पहिलाच खेळाडू नाही.
त्याआधी प्रशांत बिष्णोई, दीपक पहल, हरजिंदरसिंग, सोम्बिर गुलिया, अनिल पेहेलवान, जसपालसिंग भुल्लर असे अनेक खेळाडू भरकटले आणि गुन्हेगारीच्या मार्गाला लागले. गुणवत्ता असणारे आणि नाव कमावलेले खेळाडू गुन्हेगारीकडे का वळतात हा गहन प्रश्न आहे.
धक्कादायक आणि लज्जास्पद! गुन्हेगारीकडे वळलेले खेळाडू
सुशीलकुमार ऑलिंपिकमध्ये कुस्ती प्रकारात दोन वेळा पदक विजेता – दिल्लीत नवोदित पहिलवानाचा खून केल्याबद्दल अटकेत
सुखविंदरसिंग कुस्ती प्रशिक्षक – 12 फेब्रुवारी 2021 रोजी रोहतकमध्ये 5 लोकांचा खून केला
सोम्बिर गुलिया माजी कुस्तीपटू – राष्ट्रीय पातळीवरील तायकोंदो खेळाडूच्या खुनाबद्दल अटक
अनिल लीला उर्फ अनिल पेहेलवान राष्ट्रीय पातळीवरील वेटलिफ्टर खंडणी आणि खुनाच्या दहा प्रकरणात आरोपी
दीपक पहल मुष्टीयुद्धातील कनिष्ठ गटातील राष्ट्रीय विजेता – त्याच्यावर खून आण खंडणीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
गुंगा पेहेलवान माजी कुस्तीपटूंच्या कुटुंबातून आलेला – या कुटुंबातील 23 पैकी 13 जणांवर 125 प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल आहेत.
परमीत डबास आंतरराष्ट्रीय रग्बी खेळाडू – सोनू दरियापूर गँगचा सदस्य, तिहेरी खून प्रकरणात अटक
सूरज बहादूर राष्ट्रीय पातळीवरील तायक्वोंदो खेळाडू – दोन डझनपेक्षा जास्त दरोड्यांच्या प्रकरणात अटक
वादीवेलू मुष्टीयोद्धा 1991 मध्ये थरसू मासिकाच्या दोन कर्मचाऱ्यांच्या खून प्रकरणातील आरोपी
लेखक आणि मनाचे प्रशिक्षक ऑस्टिन कुटिन्हो यांच्या मते कामगिरी करून दाखवण्यात आलेल्या अपयशातून येणारे वैफल्य आणि असुरक्षिततेची भावना ही यामागील प्रमुख कारणे आहेत.
ते म्हणतात, खेळाडू गुन्ह्यांकडे वळण्यामागे वैफल्य हे प्रमुख कारण असते. खेळाडूमध्ये काहीतरी गाठण्याचे ध्येय असते आणि जर ते तुम्हांला गाठता आले नाही तर खूप वैफल्य येते आणि त्यामुळेच अनेक खेळाडू गुन्हेगारीकडे वळतात. त्यांच्या मते, भारतासारख्या देशात खेळाडूंचा चरितार्थ ह खेळावरच अवलंबून असतो आणि त्यांच्याकडे तेवढीच पात्रता असते. काहीवेळा खेळाडू अशा स्थितीला पोचतात की, त्यांना वाटू लागते आपल्याकडून पुरेशी चांगली कामगिरी होत नाही. त्याक्षणी त्यांच्याकडून टोकाचे पाऊल उचलले जाते.
भारतातील पहिले व्यावसायिक मुष्टीयोद्धा आणि 1991 मध्ये अर्जुन पुरस्कार मिळवणारे सगळ्यात तरुण खेळाडू, सध्या भारताच्या मुष्टीयुद्ध संघाचे प्रशिक्षक असणारे धर्मेंद्रसिंग यादव म्हणतात, काहीवेळा भावनिक उद्रेकातून खेळाडू वैयक्तिक आयुष्यात वाईट किंवा चुकीचा निर्णय घेऊन बसतात.
जेव्हा शरीराशी स्पर्श होणारा खेळ (कुस्ती, मुष्टीयुद्ध, रग्बी, कबड्डी) असतो तेव्हा त्या प्रकारातील खेळाडू हे मुळात निधड्या छातीचे असतात आणि त्याचबरोबर भावनिकही असतात. त्यामुळेच ते भावनेच्या भरात काहीही करून बसतात. त्यांची कमकुवत बाजू लक्षात घेऊन अनेकदा राजकारण्यांकडून, गुन्हेगारांकडून त्यांचे नकळत शोषण होते, त्यांच्या स्वभावाचा ते फायदा घेतात.
खेळाडूंच्या मनाचे आरोग्य, प्रशिक्षण आणि विकास या क्षेत्रात काम करणाऱ्या गायत्री जोशी म्हणतात, ज्या खेळाडूकडून गुन्हेगारी स्वरुपाचे कृत्य घडते त्यामागे त्याचे स्वतःचे कारण असते.
गुन्हेगारी वर्तनामागे अनेक कारणे असतात. त्यामध्ये नैराश्य, आरोग्याच्या समस्या, दखापती, सततचा अपमान/अवहेलना, करिअरमधील दबाव यांचा समावेश होतो.
त्यातून खेळाडूंकडून अनेकदा टोकाची प्रतिक्रिया येते, ते आक्रमक आणि हिंसक होतात. काहीवेळा अपयशामुळे ते अतिशय भावनिक होतात. चित्रपटकार तिग्मांशू धुलियाने पानसिंग तोमरच्या आयुष्यावर चित्रपट काढला होता. त्यासाठी लष्करातील जवान आणि प्रसिद्ध धावपटू एक भयानक दरोडेखोर कसा होतो याचा अभ्यास केला.
जवळच्याच बड्या आणि शक्तीशाली नातेवाईकांनी दिलेला त्रास असह्य झाल्यामुळे त्याने हाती बंदूक घेतली. पोलिसांनी त्याला कुठलेही सहकार्य केले नाही आणि तो दरोडेखोर झाला. मात्र आता परिस्थिती वेगळी असल्याचे सांगून धुलिया म्हणतो, आता खेळाडू पैसा आणि हाव यामुळे गुन्हेगारीकडे ओढले जातात.
गायत्री जोशी म्हणतात, यावर सहजसोपे उत्तर नाही. खेळाडूंचा विकास योग्य प्रकारे होण्यासाठी त्याने मानसिक आरोग्याची काळजी कशी घ्यावी याचे प्रशिक्षण आणि त्याच्या मनाच्या योग्य विकासाची गरज असते.
किशोरवयात खेळाडू घडत असताना चारित्र्य आणि नैतिक मूल्यांची जोपासना त्याच्या व्यक्तिमत्वात होण्याच्या दिशेने प्रयत्न झाले पाहिजेत. एखादा खेळाडू ज्या गोष्टींची स्वप्ने पहात असतो त्या सगळ्या गोष्टी सुशीलकुमारकडे होत्या.
व्यावसायिक यश, पदके, आदर, चाहते, पैसा, आनंदी कौटुंबिक आयुष्य. परंतु या पलीकडे नव्या कुस्तीपटूंमुळे त्याच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली असू शकतो. पुन्हा आणखी पैशाची हाव, त्यासाठीची दहशत यातून तो गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांकडे ओढला गेलेला असू शकतो. त्यातूनच एखाद्या खेळाडूला मरेपर्यंत मारहाण करण्याचे कृत्य त्याच्याकडून घडलेले असू शकते.