मुंबई : जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर राज्यभरात या घटनेचे पडसात उमटत आहे. अशात विरोधकांकडून राज्य सरकारवर निशाणा साधण्यात येत आहे. तर अशातच, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही प्रतिक्रिया समोर येत आहे. लाठीचार्जची उच्चस्तरीय चौकशी होणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले आहेत.
#जालना जिल्ह्यातील अंतरवली येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनातील आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडून या घटनेची माहिती घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत, जनतेने शांतता राखावी.
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 1, 2023
माध्यमांशी बोलतांना शिंदे म्हणाले,’जालन्यात झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी स्वत:हा उपोषकर्त्याबरोबर चर्चा केली होती. संबंधित अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या होत्या. अशा प्रकारची घटना होणं, योग्य नाही. एसपी आणि जिल्हाधिकाऱ्यांशी माझं बोलणं झालं आहे. त्यांनी सांगितलं, ‘मनोज जरांगे-पाटीलची तब्येत खालावत आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता होती.’ पण, ही दुर्दैवी घटना घडली आहे. ‘ असेही ते म्हणाले आहे.
लाठीचार्ज का करण्यात आला? या प्रश्नावर एकनाथ शिंदे म्हणाले, “पोलिसांनी सांगितलं, मनोज जरांगे यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी आम्ही गेलो होतो. मात्र, लोकांनी अडवणूक केली. त्यातून दगडफेक झाली. यानंतर लाठीचार्ज झाला. शांततेत आंदोलन करणाऱ्यांवर लाठीचार्ज करू नये, अशी सरकारची भूमिका आहे.”
दरम्यान,जालन्यात मराठा उपोषण आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जनंतर आता राज्यभरातून त्यावर प्रतिक्रिया येत आहे. जालन्यातील आंदोलन अमानुष पद्धतीनं मोडून काढण्याच्या राज्य सरकारच्या कृतीचा तीव्र निषेध करत मराठा आरक्षण प्रकरणी सरकारनं समाजाचा अंत पाहू नये असा इशारा विरोधी पक्षांनी दिला आहे. तर गृहखात्याकडून घेतलेली भूमिका ही अतिरेकी भूमिका असल्याची टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. जालन्यात झालेल्या या घटनेच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.