मुंबई : जालन्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेल्या मराठा आक्रोश मोर्चातील आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. यात मराठा मोर्चाचे समन्वयक मनोज जरांगे यांच्यासह अनेकजण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त होऊ लागला. त्यातच माजी खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी जालन्यातील मराठा आंदोलनकाची भेट घेतली. यावेळी त्यांनी लाठीचार्जच्या घटनेचा निषेध केला.
मराठा आंदोलकांशी संभाजी राजे यांनी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी ‘आंदोलकांवर तुम्ही गोळीबार कसाकाय करु शकता. मराठ्यांवर गोळी घालायची असेल तर ती आधी छत्रपती संभाजीराजेवर घाला’ अशी उदिग्न प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. तसेच कालच्या घटनेवर बोलणं मी क्रमप्राप्त समजतो. शिवाजी महाराजांचा आणि राजर्षी शाहू महाराजांचा वंशज म्हणून मी येथे बोलत आहे. शाहू महाराजांनी जगाच्या, देशाच्या इतिहासात पहिल्यांदा आरक्षण लागू केले. शाहू महाराजांनी ५० टक्के आरक्षण बहुजनांना दिलं होतं.
आज गरीब मराठ्यावर अन्याय होत आहे. त्यामुळे आंदोलनासाठी मी बाहेर पडलो आहे. मराठ्यांनी कायम शांततेने मोर्चे काढले आहेत. ५८ मोर्चे काढले पण कुठंही हिंसाचार झाला नाही. त्याची दखल जगाने सुद्धा घेतली. पण, कालच्या घटनेमध्ये लाठीचार्ज झाला, गोळ्या झाडल्या, अश्रू धुरकांड्या फोडल्या. कालचा प्रकार निंदनीय आहे. आम्ही सरकारचा निषेध करतो, असे राजे म्हणाले.
त्यासोबतच निजामाचे राज्य होतं, मोघलांचं राज्य होतं. त्यानंतर शिवाजी महाराजांचं आणि इंग्रजांचं राज्य आलं. शिवाजी महाराजांचं नाव घेऊन तुम्ही राज्य करता. हेच सुराज्य आहे का? आंदोलकांवर गोळ्या झाडायच्या का? असं होत असेल तर मी शिवाजी महाराजांचा आणि शाहू महाराजांचा वंशज म्हणून सांगतो. मराठ्यांवर गोळी घालायची असेल तर आधी संभाजी छत्रपतींवर गोळी घाला, असे ते म्हणाले.