कोल्हापूर – शिवसेनेच्या दोन्ही गटांना नवे नाव मिळाले आहे. त्यांना त्यांचे चिन्हही मिळाले आहे. शिवसेनेची मशाल आम्ही घराघरात पोहोचवण्याचे काम करू. आम्हाला हवे होते ते नाव मिळाले आहे. मात्र, बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव घेणाऱ्या शिंदे गटाने दिघे यांचे नाव का सुचवले नाही, असा सवाल कोल्हापूर शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी उपस्थित केला आहे.
एका वाहिनीशी बोलताना संजय पवार म्हणाले की, ते आनंद दिघे यांचे नाव वापरतात. त्यांचे फोटोही छापतात. बाळासाहेब ठाकरेंचे फोटो छापतात. मात्र पक्षासाठी नाव सुचविताना त्यांनी दिघे यांचे नाव का घेतले नाही असा सवाल करतानाच हे दिघे यांना विसरले आहेत. आज ना उद्या बाळासाहेब ठाकरे यांनाही विसरतील. तसेच ज्यांच्यामुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा किंवा देवेंद्र फडणवीस यांचे तरी नाव शिंदेंनी पक्षाला लावायला पाहिजे होते असा खोचक सल्ला त्यांनी दिला.