मुंबई – राज्यात घडत असलेल्या वेगवान घडामोडींमुळे व त्यातून निर्माण झालेल्या गोंधळामुळे एकूणच महापालिका निवडणुकांबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी मुंबईत संवाद साधला. त्यांनी यावेळी सकारात्मक राहात कामाला सुरुवात करण्याचे आदेश देतानाच आपण स्वळबावर लढणार असल्याचे जाहीर केले.
एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर बराच धुरळा उडला होता. शिंदे राज यांची तर राज यांनी शिंदे यांची भेट घेतली. गणपतीच्या काळात तर भाजपच्या नेत्यांनी राज यांच्या निवासस्थानाला भेट देण्याचा प्रकार निरंतर सुरू होता. भेटी होत होते व नेहमीप्रमाणे राज ठाकरे गप्प होते. या भेटी अर्थातच मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने घेतल्या जात असल्याची पतंगबाजी सुरू होती. त्यात तथ्य नाही असे नाही. मात्र शिंदे गट मनसेत विलीन होणार पासून ते राज यांचा मुलगा अमित ठाकरे यांना मंत्रिपद मिळणार इथपर्यंत चर्चासत्रे घेतली गेली.
या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर राज यांनी कार्यकर्त्यांना स्वबळावर लढण्याच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. राज्यातील सध्याची स्थिती पाहता आणि राजकीय पक्षांकडून झालेला भ्रमनिरास लक्षात घेता लोक मनसेकडे पर्याय म्हणून पाहत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. निवडणुका लढण्यासाठी पैशाची ताकद मोठी असते. तीही आपण उभी करा असा विश्वास त्यांनी यावेळी दिला. आपले सकारात्मक आणि हिंदुत्वाचे विचार लोकांपर्यंत पोहोचवा. सत्ता आली तर मी तुम्हालाच खुर्चीत बसवणार आहे. मी उडी मारून खुर्चीत बसणार नाही असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांना चिमटाही काढला.