मुंबई – ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाच्या ट्रेलरवरूनच सुरुवातीला वाद निर्माण झाला होता. अनेकांनी या चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी केली होती. त्यानंतरही हा चित्रपट 5 मे रोजी चित्रपटगृहात रिलीज झाला. अवघ्या काही दिवसातच या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली. एकीकडे या चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. तर दुसरीकडे या चित्रपटाला काहींनी प्रोपगंडा म्हणत बंदी घालण्याची मागणी केली आहे. या चित्रपटाबाबत अनेक राजकीय नेते मंडळींनी प्रतिक्रिया दिली. त्यानंतर आता बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी या चित्रपटावर प्रतिक्रिया दिली आहे.
शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की, “अद्याप मी केरळ स्टोरी पाहिली नाही. नेहमीच अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने उभे राहिले आहेत आणि प्रत्येकाला हवे ते बोलण्याचा अधिकार असला पाहिजे, पण जर एखाद्या चित्रपटामुळे राज्याच्या शांततेला धोका निर्माण होत असेल, तर त्यावर बंदी घालणे गरजेच आहे.”
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या चित्रपटावर बंदी घातली आहे. याबाबत शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, “जर त्यांना वाटत असेल की या चित्रपटामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्था निर्माण होऊ शकते, तर त्यामागे त्यांच्याकडे काहीतरी कारण असावे ”
यावेळी शत्रुघ्न सिन्हा यांनी विवेक अग्निहोत्रीच्या ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटावरही भाष्य केले आहे. ‘विवेक अग्निहोत्रीच्या ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाच्या खूप आधी मी काश्मिरी पंडितांच्या दुर्दशेबद्दल आवाज उठवला होता, पण त्यावेळी सरकारने अजिबात लक्ष दिले नाही. विवेकच्या चित्रपटामुळे काश्मिरी पंडितांबद्दल वाद सुरू झाला असेल तर मला त्याचा आनंद आहे. संवेदनशील विषयांवर चित्रपट बनले पाहिजेत, पण ते संवेदनशील पद्धतीनेच बनवले पाहिजेत. निवडणुकीच्या वेळी धर्मांतरावर चित्रपट का? ही वेळ थोडी संशयास्पद वाटते,” असेही ते म्हणाले.
दरम्यान, ‘द केरळ स्टोरी’ चित्रपट यूपी आणि मध्य प्रदेशमध्ये करमुक्त करण्यात आला आहे. त्याचबरोबर कमाईच्या बाबतीतही हा चित्रपट विक्रम करत आहे. या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन 6 दिवसात 68.86 कोटी इतके झाले आहे.