मुंबई – महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल अखेर काल आला. प्रतोत भरत गोगावले यांनी निवड चुकीची असल्याचे न्यायालयाने सांगितले तसेच राज्यपालांच्या कामावर देखील न्यायालयाने ताशेरे ओढले. यानंतर सर्वच प्रमुख पक्षांच्या राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. मात्र आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी देखील या निकालावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल बराच गोंधळात टाकणारा असल्याचे यावेळी ठाकरेंनी म्हंटले आहे.
ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काल लागलेल्या सत्तासंघर्षांवर देखील टिपण्णी केली. राज ठाकरे म्हणाले,”सर्वोच्च न्यायालयाचा निकाल बराच गोंधळात टाकणारा आहे. माझ्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याप्रकरणी मला नोटिसा देखील येतात. त्यातील त्यांची भाषा वाचल्यावर आपल्याला सोडलंय की अटक केली हेच कळत नाही. इतकी भाषा गुंतागुंतीची असते”. असं मिश्किल मत यावेळी ठाकरेंनी नोंदवलं.
राज ठाकरेंनी यावेळी ठाणे दौऱ्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील भाष्य केले. “विधिमंडळातील गट पक्ष समजला जाणार नाही, बाहेरचाच पक्ष म्हणून समजला जाईल. ही गोष्ट झाल्यावर निवडणूक आयोगाने चिन्ह आणि पक्षाचं नाव शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचं काय होणार?” असा सवाल देखील यावेळी ठाकरेंनी उपस्थित केला.