गंगटोक – सिक्कीममध्ये ज्या सरकारी कर्मचाऱ्यांना दोन-तीन मुले आहेत त्यांना आता पगारवाढ मिळू शकणार आहे. यासोबतच या कर्मचाऱ्यांच्या अतिरिक्त इन्सेन्टीव्ह अथवा ऍडव्हान्स देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सिक्कीम सरकारने हा निर्णय राज्याची स्थानिक लोकसंख्या वाढवण्यासाठी घेतला आहे.
यावर्षी 1 जानेवारीपासून हा निर्णय पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू केला जाणार आहे. ज्या कर्मचाऱ्यांचे दुसरे आणि तिसरे अपत्य या वर्षी 1 जानेवारीला किंवा त्यानंतर जन्मले आहे तेच या योजनेसाठी पात्र असतील. एखाद्याने बालक दत्तक घेतल्यास मात्र या योजनेचा लाभ लागू होणार नाही.
10 मे रोजी जारी केलेल्या अधिसूचनेत कार्मिक विभागाचे सचिव रिंजिंग चेवांग भुतिया यांनी सांगितले की, सिक्कीमचे नागरिक असल्याचे ओळख प्रमाणपत्र धारण करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना दोन मुले असल्यास त्यांच्या पगारात वाढ केली जाईल. यासोबतच ज्या कर्मचाऱ्यांना तीन अपत्ये आहेत त्यांच्या पगारात भरीव वाढ दिली जाणार आहे.
उल्लेखनीय म्हणजे, सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांनी राज्यातील स्थानिक लोकांमधील कमी प्रजनन दराकडे लक्ष वेधण्यासाठी सवलतीचे आश्वासन दिले होते. आता आश्वासनानंतर तब्बल 4 महिन्यांनी ही योजना समोर आली आहे. तमांग यांनी या वर्षी जानेवारीमध्ये गंगटोक येथे एका कार्यक्रमात सांगितले होते की,
सिक्कीममधील स्थानिक लोकांमध्ये कमी प्रजनन दर हा गंभीर चिंतेचा विषय आहे. लोकसंख्या वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत. सुमारे सात लाख लोकसंख्या असलेले सिक्कीम हे भारतातील सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य आहे. राज्याचा एकूण प्रजनन दर 1.1 आहे, जो देशात सर्वात कमी आहे.