नवी दिल्ली – घाऊक किमतीवर आधारित महागाईचा दर डिसेंबर महिन्यात वाढून 0.73% इतका नोंदला गेला आहे. भाजीपाला महाग झाल्यामुळे या महागाईचा दर वाढला असल्याचे समजले जाते. वाढलेला हा महागाईचा दर नऊ महिन्याच्या उच्चांकावर आहे.
मात्र एकूण परिस्थिती पाहता या महागाईचा दर डिसेंबर महिन्यात वाढून 0.90% होण्याची अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली होती.
मात्र सरकारने केलेल्या उपाययोजनामुळे हा दर त्यापेक्षा कमी पातळीवर विसावला असल्याबद्दलही समाधान व्यक्त करण्यात येत आहे. किंबहुना या घडामोडीचा आज भारतीय शेअर बाजारातील घडामोडीवर नकारात्मक परिणाम झाला नाही. उलट आज बरीच खरेदी होऊन शेअर बाजाराचे निर्देशांक जवळजवळ एक टक्क्याने वाढले.
एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत हा निर्देशांक 0% च्या खाली होता. नोव्हेंबर महिन्यात तो 0.26 टक्क्यावर आला. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये हा निर्देशांक 5.02% इतका होता. भारतातील महागाईच्या आकडेवारीने बरीच वळणे घेतलेली आहेत. उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयाने आकडेवारीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, अपेक्षेप्रमाणे या महागाईचा दर काही प्रमाणात वाढला आहे.
भाजीपाला, फळे, यंत्रसामग्री, वाहतूक उपकरणे, संगणक, इलेक्ट्रॉनिक्स इत्यादी वस्तूच्या किमती वाढल्यामुळे या महागाईचा दर वाढला तरी तो अपेक्षेपेक्षा जास्त वाढलेला नाही. त्यामुळे ही महागाई लवकरच नियंत्रणात येण्याची शक्यता आहे असे मंत्रालयाने म्हटले आहे.
व्याजदर कपात नाही
केंद्र सरकारने अगोदरच अन्नधान्याचा पुरवठा वाढावा यासाठी उपाययोजना केल्या आहेत. त्याचबरोबर रिझर्व बँकेने व्याजदर उच्च पातळीवर ठेवलेले आहेत. त्यामुळे महागाई अपेक्षेप्रमाणे नियंत्रणात असल्याचा दावा सरकारने केला आहे. मात्र किरकोळ महागाईचा दर पाच टक्क्यापेक्षा जास्त आहे तर घाऊक महागाईचा दर जवळ जवळ एक टक्का झाला आहे. त्यामुळे आगामी पत धोरणातही रिझर्व बँक व्याजदरात घट करण्याची शक्यता आता मावळली आहे. मात्र व्याजदर सध्याच्या पातळीवर ठेवून रिझर्व बँक भांडवल सुलभता वाढविण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.