पणजी – पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात विरोधकांनी समर्थ पर्याय निश्चित करूनच त्यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरणे गरजेचे आहे, असे तृणमूल कॉंग्रेसने म्हटले आहे.
पक्षाच्या प्रवक्त्या सुश्मिता देव यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना ही बाब नमूद केली. त्या म्हणाल्या की, मोदींच्या विरोधात ममता बॅनर्जींचे नेतृत्व दमदारपणे पुढे येत आहे. गोव्यात आम्ही कॉंग्रेसची मते खाण्यासाठी निवडणूक लढवत नाही आहोत असे स्पष्ट करून त्या म्हणाल्या की, केवळ गोवाच नव्हे तर अन्यही राज्यांत आम्ही आमचा पाया विस्तारत आहोत.
कॉंग्रेसचा देशभर चांगला पाया आहे, पण तरीही त्यांचे नेतृत्व मोदींच्या विरोधात सतत का पराभूत होते, असा सवालही त्यांनी केला आहे. मोदींना पर्याय कोण? हा सध्या देशातील मोठा प्रश्न असून तो पर्याय निश्चित केल्याशिवाय भाजपच्या विरोधात सक्षमपणे निवडणूक लढवणे योग्य ठरत नाही असे त्या म्हणाल्या.
मोदींना पर्याय कोण याचे उत्तर कॉंग्रेसनेच द्यायला हवे, असेही त्यांनी नमूद केले. ममता बॅनर्जी या विरोधकांचा पंतप्रधानपदाचा चेहरा असतील काय, असे विचारता त्या म्हणाल्या की विरोधी पक्षांनी सामूहिकपणे हा निर्णय घ्यायचा आहे.