नागरिकांचा सवाल : आरोग्य विभागाकडून नगरसेवक, पदाधिकाऱ्यांची बडदास्त
आळंदी – तीर्थक्षेत्र आळंदीचा वाढता विस्तार पाहिला असता दिवसेंदिवस येथील दैनंदिन नागरी समस्यांमध्ये देखील वाढ होताना दिसत आहे. सध्या शहरात कचऱ्याचे ढीग साचलेले असतानाही नगरपालिकेला हद्दीबाहेरील कचरा उचलण्यात रस दिसून येत असल्याने अलंकापुरीतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तर आरोग्य अधिकारी म्हणतात की, नगरसेवक, अधिकारी, पदाधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून आम्ही हा हद्दीबाहेरील कचरा उचलत असल्याचे स्पष्ट केल्याने आळंदी नगरपालिका नागरिकांसाठी की नगरसेवक, अधिकाऱ्यांसाठी काम करते? असा सवाल उपस्थित होत आहे.
शहराऐवजी हद्दीबाहेरील कचरा उचलण्यातच अधिक रस
आळंदी शहराचा वाढता विस्तार पाहता आरोग्य विभागाला लाखोंचा ठेका देऊन शहरातील कचरा उचलण्याचे टेंडर काढले जाते. शहराच्या अनेक भागात कचऱ्याचे ढीग साचलेले दिसतात, गल्लीबोळातील रस्ते स्वच्छ केले जात नाहीत, कचऱ्याच्या घंटा गाड्या वेळेवर येत नाहीत, अशा नागरिकांच्या आळंदी नगरपालिका आरोग्य विभागाच्या तक्रारी आहेत. तरीही आळंदी नगरपालिकेचे सफाई कर्मचारी हे आळंदीतील कचरा प्रथम उचलायचा सोडून आळंदी हद्दीलगत असणाऱ्या पालिकेच्या बाहेरील हद्दीत जाऊन प्रथम त्यांचा कचरा उचलल्याचे निदर्शनास येत असल्याने नगरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
आळंदी पालिकेचे आरोग्य विभागाचे प्रमुख विलास पवार म्हणाले की, हद्दीबाहेरील कचरा उचलण्याचे कारण असे की संबंधित रहिवासी हा त्यांच्या हद्दीतील कचरा हा आळंदी नगरपालिका हद्दीत लगत रात्रीच्या वेळी टाकतात तो देखील आम्ही उचलून नेतो. तरीही काही आपल्या मर्जीतील मंडळी, नगरसेवक, अधिकारी, पदाधिकारी हे आम्हाला सांगतात त्याठिकाणी जाऊन कचरा तुम्ही गोळा करून आणा. आम्ही कर्मचारी असल्याने आम्हाला संबंधितांकडून जे आदेश दिले जातील त्याचे पालन करीत त्या-त्या ठिकाणी जाऊन आम्ही कचरा घेऊन येतो; परंतु हे करीत असताना आळंदी शहरातील कचरा देखील आमचे आरोग्य विभाग वेळोवेळी उचलत आहे.
गौडबंगाल आळंदीकरांना समजेल का?
चऱ्होली खुर्द हद्दीत असणाऱ्या तनिष सृष्टी तसेच वडगाव रस्ता, केळगाव रस्ता, काटेवस्ती आदी पालिकेच्या बाहेरील हद्दीतील कचरा सोसायटी तसेच घरोघरी जाऊन गोळा केला जात असल्याचे सामाजिक कार्यकर्ते संदीप नाईकरे यांनी ही बाब सोशल मीडियावर निदर्शनास आणून दिली. तसेच त्यांनी सांगितले की, आळंदी शहरातील कचरा वेळेत उचलला जात नसून पालिकेच्या बाहेरील हद्दीतील कचरा मात्र, वेळेत उचलला जातो याचे गौडबंगाल आळंदीकरांना समजेल का? असा सवाल त्यांनी उपस्तित केला आहे.
नागरिकांचे आरोग्य धोक्यात
कचरा ही अशी समस्या आहे की, एकाद्या ठिकाहून सकाळी उचल नेलेला कचरा सायंकाळीपर्यंत जैसे थे साचलेला दिसून येतो, त्यामुळे आळंदीकर नागरिकांना वाटते की आळंदी पालिकेचे आरोग्य विभागाचे कर्मचारी शहरातील कचरा उचलण्यात कुचराई करतात; मात्र ही बाब असत्य असून, आम्ही वेळच्या वेळी शहरातील कचरा उचलून नेतो.
– विलास पवार, आरोग्य विभाग प्रमुख, आळंदी नगरपालिका