मुंबई – आपल्या मंजुळ स्वरांची मोहिनी टाकत अख्ख्या जगाला मंत्रमुग्ध करणाऱ्या गायिका आणि भारतरत्न पुरस्काराने सन्मानित लता मंगेशकर यांचे आज निधन झाले. लता दीदीच्या जाण्याने सर्व क्षेत्रातून शोक व्यक्त करतण्यात येत आहे. शेकडो हिंदी चित्रपट आणि सुमारे 36 देश विदेशी भाषांमध्ये आपला स्वरसाज उमटवला.
लता मंगेशकर 6 वर्षांसाठी राज्यसभेच्या सदस्य राहिल्या होत्या. त्यांच्या या सदस्यत्वाच्या कालावधीमध्ये त्यांनी संसदेकडून कोणताही भत्ता स्वीकारला नाही, ही त्यांच्या सदस्यत्वाची एक खासियत म्हणावी लागेल.
लता दीदींना भाजपने राज्यसभेवर पाठवले होते. त्यांची राज्यसभेवर 22 नोव्हेंबर 1999 रोजी निवड झाली. तेंव्हापासून 21 नोव्हेंबर 2005 पर्यंत त्या राज्यसभेच्या सदस्या राहिल्या होत्या. या कालावधीदरम्यान त्यांनी संसद सचिवालयाकडून कोणताही भत्ता स्वीकारला नाही. सचिवालयाकडून त्यांना देण्यात आलेली सर्व देयके परत पाठवण्यात आली होती, असे सचिवालयाच्या कागदोपत्री नोंदींमधून स्पष्ट होते आहे.
मात्र या 6 वर्षांच्या कालावधीमध्ये त्या फारच थोडा काळ संसदेमध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहू शकल्या होत्या. त्या केवळ 12 दिवस संसदेमध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहू शकल्या होत्या, या 6 वर्षांच्या कालावधीमध्ये त्यांनी केवळ एकच बिगर तारांकित प्रश्न संसदेमध्ये उपस्थित केला होता. रेल्वे रुळावरुन घसरण्याच्या घटना वाढल्या आहेत का ? असा हा प्रश्न होता.