चंदीगड – कॉंग्रेसने मुख्यमंत्रीपदासाठी दहा उमेदवार घोषित केले तरी त्याचा काही उपयोग होणार नाही, पंजाबात या पक्षाला सरकार स्थापन करता येणार नाही असे आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भगवंत मान यांनी म्हटले आहे.
कॉंग्रेस आता पंजाबात सरकार स्थापन करण्याच्या स्थितीत नाही असेही त्यांनी म्हटले आहे. बरनाला येथे पक्षाच्या एका प्रचार सभेत बोलताना ते म्हणाले की आम आदमी पक्षाला या राज्यात सरकार स्थापन करण्यापासून आता कोणीही रोखू शकणार नाही.
ते म्हणाले की लोकांच्या मनात आम आदमी पक्षाविषयी विशेष सहानुभुती आणि विश्वास आहे. आमच्या पक्षाने दिल्लीत जसे काम केले आहे तसे सरकार त्यांना आता पंजाबात हवे आहे. आणि आम्हीही दिल्लीतील आपच्या सरकारप्रमाणेच येथे काम करून लोकांच्या विश्वासाला पात्र राहू.
ते म्हणाले की गेल्या 44 वर्षात येथील लोकांनी कॉंग्रेस आणि अकालीदलाला आलटूनपालटून सत्तेवर आणले पण या दोन्ही पक्षांनी येथे काहीही केले नाही. येथील लोकांना आता बदल आणि चांगला पर्याय हवा आहे आम आदमी पक्षाने तो दिला आहे असेही त्यांनी म्हटले आहे.