नवी दिल्ली – केंद्र सरकारने घटनेचे कलम 370 रद्द करूनही जम्मू काश्मीरात शांतता प्रस्थापित होऊ शकली नाही असा आक्षेप घेतला जात आहे. आता कलम 370 पुन्हा प्रस्थापित केल्या शिवाय काश्मीरात शांतता प्रस्थापित होऊ शकत नाही असे सांगितले जात आहे.
तथापि जम्मू काश्मीरात जेव्हा हे कलम अस्तित्वात होते त्यावेळी तरी तेथे शांतता कोठे होती असा सवाल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे. एका माध्यम संस्थेने आयोजित केलेल्या लीडरशिप समिट मध्ये ते बोलत होते. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूख अब्दुल्ल यांनी याच परिसवांदात बोलताना कलम 370 पुन्हा लागू केल्याशिवाय काश्मीरात शांतता प्रस्थापित होऊ शकत नाही असे म्हटले आहे. त्याला प्रत्युत्तर देताना अमित शहा बोलत होते.
शहा म्हणाले काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 गेल्या 75 वर्षांपासून अस्तित्वात होते. पण त्या काळात तरी काश्मीरात कोठे शांतता होती. 1990 साली हे कलम अस्तित्वात नव्हते काय, पण त्या साली तरी काश्मीरात शांतता का प्रस्थापित होऊ शकली नाही असा सवाल त्यांनी केला. पण हे कलम अस्तित्वात असताना काश्मीरात जितक्या हत्या झाल्या आहेत त्याच्या दहा टक्केही हत्या सध्या होताना दिसलेल्या नाहीत. याचा अर्थ जम्मू काश्मीरात सध्या शांतता आहे असा दावाही अमित शहा यांनी केला.
जम्मू काश्मीरात मतदार संघांची फेररचना केली जाईल आणि ती झाल्यावर तेथे निवडणुका घेतल्या जातील आणि त्यानंतर जम्मू काश्मीरला पुन्हा पुर्ण राज्याचा दर्जा देण्याची प्रक्रिया सुरू होईल असे शहा यांनी सांगितले. जम्मू काश्मीरात आता मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू असून तेथील कायदा आणि सुव्यवस्था स्थितीही सुधारली आहे अत्यंत कमी वेळात आम्ही तेथे लक्षणीय बदल घडवून आणला आहे असे त्यांनी नमूद केले.