मुंबई – काश्मिरातील हिंदू आणि काश्मिरात स्थलांतरित झालेल्यांच्या हत्या होत असल्याबद्दल शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून चिंता व्यक्त केली आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये काश्मिरात होत असलेल्या हत्यांमुळे हिंदू समाजामध्ये प्रामुख्याने काश्मिरी पंडीत आणि काश्मीर खोऱ्यात रहात असलेल्या स्थलांतरीत नागरिकांमध्ये भीती आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. या हत्यांमुळे ही भीती आणि असुरक्षिततेची भावना अधोरेखित झाली आहे, असे चतुर्वेदी यांनी शहा यांना लिहीलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे.
काश्मीरमधील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी केंद्र सरकारकडून पुरेशा उपाय योजना केल्या जात नसल्याचा आरोपही चतुर्वेदी यांनी केला. काश्मिरी पंडीत आणि स्थलांतरीतांचा विकास आणि पुनर्वसनासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या योजनांच्या अंमलबजावणीवर या हत्यांमुळे प्रश्नचिन्ह होत आहे. काश्मीर खोऱ्यात नियुक्त असलेले सरकारी कर्मचारी आता जम्मूत बदली व्हावी अशी मागणी करत असल्याचेही चतुर्वेदी यांनी म्हटले आहे.