नवी दिल्ली – आर्थिक गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी आर्थिक गुन्ह्यांची प्रकरणे शेवटपर्यंत तडीला न्यावित आणि हे काम वेगाने निपटावे असे आवाहन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले आहे.
डायरेक्टर ऑफ रेव्हेन्यु इंटिलिजन्सच्या 64 व्या स्थापना दिनानिमीत्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अशा प्रकरणात शेवटपर्यंत कारवाई तडीला नेल्यास अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्यांना जरब बसू शकेल असे त्यांनी नमूद केले.
या विभागाकडे सक्षम यंत्रणा असण्याची गरज व्यक्त करून त्या म्हणाल्या की एखाद्या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर त्यावर तातडीने कारवाई होण्यास त्यामुळे मदत होईल. त्या म्हणाल्या गुप्तचर सूत्रांकडून अनेक प्रकरणाची माहिती मिळते पण त्यातील प्रत्येक प्रकरणावरच कारवाई केली जात नाही.
काही वेळेला त्वरीत कारवाई करणे हे क्षमते अभावी शक्य होत नाही. गुप्तचर सूत्रांतून मिळणाऱ्या प्रत्येक माहितीवर कारवाई होण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. प्रत्येकवेळी गुन्हा झाल्यावर कारवाई होण्याबरोबरच हे गुन्हे रोखण्यासाठीही उपाययोजना सुरू करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
देशात घातक आणि विषारी स्वरूपाचा भंगार माल मोठ्या प्रमाणात डम्प केला जात आहे त्याकडेही डीआरआयने लक्ष दिले पाहिजे असे त्या म्हणाल्या. डीआरआयने केलेल्या कारवाईला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धीही मिळण्याची गरज आहे असे त्या म्हणाल्या.