नवी दिल्ली – रिलायन्स जिओ ही देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी डिसेंबर 2023 पर्यंत देशातील प्रत्येक भागात अल्ट्रा हाय-स्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटी देणाऱ्या 5 जी दूरसंचार सेवेचा विस्तार करेल, असे या कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी म्हटले आहे.
जिओने सप्टेंबर 2016 मध्ये दूरसंचार क्षेत्रात प्रवेश केला आहे. आता ही देशातील दूरसंचार क्षेत्रातील एक प्रमुख कंपनी बनली आहे. आम्ही 5 जीची सेवा सामान्य लोकांना परवडणाऱ्या दरांत देऊ अशी ग्वाहीही मुकेश अंबानी यांनी दिली आहे.
अंबानी यांनी ऑगस्टमध्ये त्यांच्या प्रमुख रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या वार्षिक भागधारकांच्या बैठकीत दिवाळीपर्यंत दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या चार मेट्रो शहरांमधून 5G सेवा सुरू करण्याची घोषणा केली होती.
कृषी, सेवा, व्यापार, उद्योग, अनौपचारिक क्षेत्र, वाहतूक आणि ऊर्जा पायाभूत सुविधांचे डिजिटायझेशन आणि बुद्धिमान डेटा व्यवस्थापनाला गती देऊन शहरी आणि ग्रामीण भारतातील दरी कमी करण्यासाठी ही 5 जी सेवा उपयुक्त ठरेल असे ते म्हणाले.
ते म्हणाले की यामुळे देशात उद्योजकतेला मोठा वाव मिळेल त्यातून गुंतवणूक आणि रोजगारही वाढेल असे ते म्हणाले. या सेवेमुळे भारत जगातील आघाडीवरचा डिजीटल समान व्यवस्था बनू शकतो असेही अंबानी यांनी नमूद केले. 5 जी ही डिजीटल सेवा कामधेनु सारखी स्वर्गीय सेवा आहे असेही त्यांनी नमूद केले.