इच्छुकांकडून राजकीय हालचाली गतिमान
समीर भुजबळ
वाल्हे – नगरपालिका, जिल्हापरिषद व पंचायत समिती यासारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे सर्वच राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांवर सुमारे दीड ते दोन वर्षांपासून प्रशासकीय राजवट सुरू असल्यामुळे या संस्थांच्या निवडणुका केव्हा होणार? असा प्रश्न राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या संभाव्य उमेदवारांनी निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने जोरदार पूर्वतयारी सुरू केली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थावर राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना नेतृत्व करण्याची संधी मिळत असते. यात दीड वर्षापासून प्रशासकीय राजवट सुरू असल्यामुळे निवडणुकीचा कार्यक्रम केव्हा जाहीर होणार? असा प्रश्न पदाधिकाऱ्यांमध्ये उपस्थित होत आहे. दोन वर्षांपासून निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी पूर्वतयारी सुरू केली असून विविध कार्यक्रमांचे आयोजन करून मतदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न उमेदवारांकडून केला जात आहे.
नगरपालिकेवर दीड वर्षांपासून तर जिल्हा परिषदेवर 15 महिन्यांपासून प्रशासकीय राजवट असल्यामुळे जिल्ह्यात समस्या निर्माण झाल्या आहेत. पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून नागरिक समस्या सोडवित असतात. निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार कार्यक्रमास हजेरी लावून भेटी घेत आहेत.
त्यामुळे चुरस रंगणार
गावागावांत वाढदिवसानिमित्त लावण्यात येणाऱ्या शुभेच्छा फलकांवर भावी नगराध्यक्ष, भावी नगरसेवक, भावी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य असा उल्लेख उमेदवारांच्या समर्थकांकडून केला जात असल्यामुळे आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चुरशीच्या होणार यात काही शंका नाही.
सर्वच पक्षांसमोर आव्हान
सर्वच राजकीय पक्षांच्यावतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत नियोजन केले जात आहे. शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट पडल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून वर्चस्व सिद्ध करण्याचे आव्हान सर्वच पक्षांसमोर उभे राहिले आहे.
विकासाच्या “गोंडस’नावाखाली…
राज्यात विकासाच्या गोंडस नावाखाली नवीन राजकीय समीकरणे निर्माण झाले असून कट्टर विरोधक राजकीय व वैयक्तिक मतभेद दूर करून एकत्र आल्यामुळे त्याचा फायदा कोणाला होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बदलती समीकरणे
जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संघटन मजबूत असले तरी सध्या त्यांच्यात दोन गट पडले आहेत. भाजपनेही चांगली उभारी घेतली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये देखील अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार असे दोन गट निर्माण झाले आहेत. तर शिवसेनेचे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गट असे दोन गट आहेत. तर भोर, पुरंदर सोडले तर कॉंग्रेसचे अस्तित्व नगण्य आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्वच राजकीय पक्षांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असल्यामुळे त्याचे नियोजन केले जात आहे.