आयपीएल स्पर्धा अखेरच्या टप्प्यावर आहे. त्यातही कोलकाता नाईट रायडर्सचे स्पर्धेतील आव्हान प्लेऑफ पूर्वीच संपुष्टात आले आहे. त्यामुळे रिंकू सिंगचे काय होणार हा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे.
या मुलाने स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच आपली गुणवत्ता सिद्ध केली. त्याने गुजरात टायटन्सचा डावखुरा वेगवान गोलंदाज यश दयाळ याच्या एकाच षटकात पहिला चेंडू वगळता अन्य पाचही चेंडूंवर सलग पाच षटकार खेचले व विजयासाठी आवश्यक 28 धावा काढल्या व कोलकाताचा विजय सकार केला. याच रिंकूची दहशत यंदाच्या स्पर्धेतील जवळपास प्रत्येक संघाने घेतली.
लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या अखेरच्या साखळी लढतीतही रिंकूनेच त्यांना घाम फोडला होता मात्र, त्याने दुहेरी धाव न घेण्याची चूक केली व कोलकाताला हा सामना एका धावेने गमवावा लागला. हे झाले स्पर्धेतील त्याच्या कामगिरीचे विश्लेषण आता त्याच्या भविष्याबाबत बोलायचे तर त्याला भारतीय क्रिकेटमध्ये कोणीही गॉडफादर नाही.
येत्या काळात भारतीय संघ आशिया करंडक तसेच त्यानंतर भारतातच एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धा खेळणार आहे. जीतकी चर्चा यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल यांची झाली तेवढी चर्चा रिंकूची झाली नाही. त्याला वाली कोण. का जे अम्बाती रायडूचे झाले तेच रिंकूचेही होणार.
डोक्यावर कोणाचा हात नसल्याने एकतर संघाबाहेर राहण्याचा मनस्ताप सहन करायचा किंवा आयपीएल ते आयपीएल इतकीच कारकीर्द सुरू ठेवायची. विक्रमादित्य सुनील गावसकर, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी तरी त्याच्याबाबत मत व्यक्त करत बीसीसीआय किंवा निवड समितीला संकेत दिले असते तर त्याचा निश्चितच लाभ झाला असता. मात्र, ते केवळ विराट कोहली, रोहित शर्मा यांच्याच बाबतीत बोलताना दिसतात.
एक केवळ रवी शास्त्री यांनीच काय ते रिंकूबाबत मत व्यक्त करताना त्याला भारताच्या मर्यादित षटकांसाठीच्या संघात स्थान देण्यात यावे असे मत मांडले होते. मात्र, त्यांचे मत निवड समिती व बीसीसीआय विचारात घेणार का हाच काय तो प्रश्न आहे.