सर्वांना हवाहवासा असलेला हा पावसाळा आपल्यासोबत आरोग्याच्या अनेक समस्यांना घेऊनच येतो. पावसाळ्यामध्ये शरीरात दोष उद्भवतात (वात, पित्त आणि कफ) आणि त्याची परिणती पचनसंस्था कमजोर होण्यात, प्रतिकारशक्ती कमी होण्यात होते. त्यामुळे पावसाळ्यात आपले शरीर निरोगी ठेवायचे असेल तर काही खबरदाऱ्या घेणे क्रमप्राप्त आहे. खाण्याच्या चांगल्या सवयी आणि आरोग्यदायी पदार्थ तुम्हाला आजारांपासून लांब ठेवण्यास मदत करू शकतील.
पावसाळ्यात आवर्जून खावेत असे पदार्थ भाजलेले मक्याचे कणीस/भुट्टा
पावसाळ्यात लिंबाचा रस पिळलेला आणि मीठ शिंपडलेला भुट्टा खायला कोणाला आवडत नाही. मका चविष्ट तर आहेच, शिवाय आरोग्यासाठीदेखील लाभदायक आहे. मक्यामुळे किडनी, पोट आणि हृदयाच्या समस्या उद्भवत नाहीत. मक्यात अनेक व्हिटॅमिन्स असल्याने तो पावसाळ्यात आवर्जून खावा. मका मूळत:च कोरडा असल्याने तो शरीरात पाणी साठून राहण्यास प्रतिबंध करतो. मक्यामध्ये मोठया प्रमाणावर विद्राव्य फायबर असल्याने तो पोटाच्या आरोग्यासाठीदेखील उपयुक्त ठरतो. मक्यात व्हिटॅमिन बी, थायमिन, नियासिन, फोलेट आणि रायबोफ्लेविन असल्याने तो बी व्हिटॅमिनचा चांगला स्रोत ठरतो. मक्यात अगदी थोडया प्रमाणात व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन ई देखील असते.
आल्याचा चहा
पावसाळ्यात आल्याचा चहा घेणे म्हणजे सुख असते. चवीकरिता मध-लिंबूही टाकता येते. या चहामुळे भूक लागते व वाढतेदेखील. आल्यामुळे सांध्यांमधील आणि स्नायूंमधील काठिण्य व दाह कमी होत असल्याने आल्याचा चहा आर्थ्रायटिसच्या रुग्णांकरिता अतिशय उपकारक ठरतो.
गरमागरम रसम
रसम म्हणजे आंबट गोड, झणझणीत असे दक्षिण भारतीय सूप. रसममुळे पोटामध्ये पाचक रस स्रवण्यात वाढ होते आणि ते पावसाळ्यात कमजोर झालेल्या पचनशक्तीकरिता लाभदायक ठरते. रसममधील टोमॅटो, चिंच, काळीमिरी, कडीपत्ता इ.मुळे रसम स्वादिष्ट आणि पोषक बनतो. रसममधील चिंच आणि टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडण्ट्स आणि व्हिटॅमिन सी असल्याने आपल्या शरीरात ऑक्सिडीकरणाने झालेले नुकसान भरून निघते. या घटकांमुळे कफ आणि थंडीला प्रतिबंध होतो. रसममधील काळ्यामिरीमुळे वजन कमी होण्यास मदत होते.
पावसाळ्यात हेही करा..
पावसाळ्यात संसर्गाना प्रतिबंध करणाऱ्या चिंच, मेथी, लसूण, कांदा अशा पदार्थाचे सेवन करावे. आले आणि लसनामध्ये मोठया प्रमाणात असणाऱ्या सल्फरमुळे विषाणूंमुळे होणारे आजार आणि इतर अनेक आरोग्यविषयक समस्यांपासून संरक्षण मिळते.
पावसाळ्यात हे पदार्थ खाणे टाळा
शिळे किंवा रस्त्यावरचे पदार्थ खाऊ नका.
ताजे, नुकतेच शिजवलेले अन्न खाण्यावर भर द्या. पावसाळ्यात दूषित पाण्याची समस्या उद्भवत असल्याने पाणी गाळून घेण्याकरिता उत्तम फिल्ट्रेशन सिस्टीम वापरण्याची किंवा पाणी उकळून घेण्याची खबरदारी घ्यावी. पावसाळ्यात पाणी पिण्याची इच्छा होत नाही किंवा तहान लागत नाही, पण तरीही दिवसातून दहा ग्लास पाणी पोटात गेलेच पाहिजे.
पकोडे/भजी
पावसाळ्यात चहा आणि भजी खाण्याचा मोह कोणाला होणार नाही, पण हीच भजी रस्त्यावरची असेल तर ती किती वेळा तळली गेली असेल किंवा अस्वच्छ जागी बनली असेल याची कल्पना करवत नाही. तुम्ही ती घरी करत असाल तरीही भजी खाणे शक्यतो टाळाच. कारण पावसाळ्यामध्ये शरीराची पचनशक्ती कमजोर झालेली असते आणि बेसनाने बनलेल्या भज्या पचनशक्तीवर प्रचंड ताण आणतात.
चाट/पाणीपुरी
चाट हे रस्त्यावरचे अजून एक लोकप्रिय खाणे. पाणीपुरी, दहिपुरी, रगडा पॅटीस, भेळपुरी इ. सर्व प्रकार चाटमध्ये मोडतात. हे चटकदार खाणे आहे आणि अर्थातच लोकांच्या अतिशय आवडीचे आहे, पण पावसाळ्यामध्ये प्रदूषित पाण्याची समस्या असल्याने हे पदार्थही तितकेच आपल्याला आजारी बनवू शकतात. या चाटकरिता लागणाऱ्या चटण्या कोथिंबिरीपासून बनलेल्या असतात.
पावसाळ्यात हवेत आर्द्रता जास्त असल्याने कोथिंबीर फार लवकर खराब होते आणि तिच्यात बुरशी किंवा अमिबा असे सूक्ष्म जीव-जीवाणू वाढीस लागण्याची शक्यता असते. पुन्हा हे सर्व पदार्थ उघड्यावर ठेवलेले असतात. स्वच्छतेच्या दृष्टीने हे पदार्थ सरसकट टाळले जायला हवेत. तुम्ही हे उघड्यावरचे अस्वच्छ पदार्थ खाल्लेत तर अतिसार, कावीळ, अमिबायसिस आणि इतर आजार उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.
चायनीज
कृत्रिम रंग, अजिनोमोटो, मीठ व तेलाचे प्रचंड प्रमाण असलेल्या सॉसेसची भर त्याच्यामुळे चायनीज खाणे आरोग्याकरिता अतिशय वाईट खाणे ठरते. रस्त्यावरचे खाल्ले जाणारे चायनीज म्हणजे हवेतून आणि पाण्यातून पसरणाण्या आजारांची बजबजपुरी असते. असे अस्वच्छ आणि शरीरास अपायकारक पदार्थ खाल्ल्याने श्वसनास त्रास होणे, मळमळल्यासारखे वाटणे, डोकेदुखी, मायग्रेन्स, तोंडाची जळजळ, पोटदुखी इ. समस्या होऊ शकतात.
मासे आणि इतर सी फूड
पावसाळा हा माशांच्या प्रजननाचा काळ असतो, त्यामुळे पावसाळ्यात मासे खाणे टाळावे.
अस्वच्छ पालेभाज्या
पालेभाज्या खाणे शरीराकरिता अतिशय लाभदायक असते ही वस्तुस्थिती असली तरी पावसाळ्यात या भाज्यांना चिखल, घाण लागण्याचे, त्यांमध्ये जीव-जीवाणू वाढीस लागण्याचे, ओलाव्याने भाज्या कुजण्याचे आणि त्यामुळे पोटाचे संसर्ग होण्याचे प्रमाण वाढते. पालेभाज्या खायच्या असतीलच तर त्या सर्वप्रथम पोटॅशियम परमॅंगनेटने धुवून घ्या आणि त्यानंतर स्वच्छ पाण्यात धुवून काढा, जेणेकरून त्यांतील सर्व घाण, माती आणि जीव-जीवाणू निघून जातील.
कार्बनेटेड पेये
कार्बनेटेड पेयांमुळे शरीरातील मिनिरल्स कमी होतात तसेच शरीराची एन्झाईम्स तयार करण्याची क्षमताही मंदावते. याची परिणती अपचन होण्यात होते. पावसाळ्यात पचनशक्ती कमजोर होत असल्याने किमान पावसाळ्यात तरी कार्बनेटेड पेये पिणे टाळलेले उत्तम.
पावसाळ्यात तुमचे खाद्यपदार्थ ताजे आणि स्वच्छ कसे ठेवावेत?
भाज्यांवर फार काळ पाणी राहू देऊ नका. भाज्या ओल्या किंवा दमट असतील तर त्यांमध्ये बुरशी आणि जीवाणूंची वाढ होण्याची शक्यता वाढते. भाज्या व फळे पूर्णपणे कोरडी करा आणि ती कागदात गुंडाळून रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा.
भाज्या आणि फळे कापून फ्रीजमध्ये ठेवू नका.
- खाण्याचे पदार्थ, अन्न नेहमी झाकून ठेवा. घर स्वच्छ ठेवा.
- नेहमी नुकतेच तयार केलेले ताजे अन्न खा. शिळे पदार्थ खाणे टाळा.
- कोबी, कॉर्नफ्लॉवर आणि इतर फुलभाज्या मिठाच्या पाण्यात धुवून मगच वापरा.
- हिरव्या पालेभाज्या देखील मीठाच्या पाण्याने किंवा पोटॅशियम परमॅगनेटने धुवून घ्या.