मुंबई: मागील काही दिवसांपासून राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच शाब्दिक चकमक होताना दिसत आहे. त्यातच आता भाजपचे नेते निलेश राणे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. यावेळी निलेश राणे यांनी मुंबईचे सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना मुख्यमंत्र्यांनी केलेल्या मध्यरात्रीच्या फोनचा संदर्भ दिला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईचे सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना नववर्षाच्या पूर्वसंध्येला फोन करुन शुभेच्छा दिल्या त्याविषयी पाटील यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.
मध्यरात्री मुख्यमंत्र्यांना नववर्षाच्या शुभेच्छा देणारा संदेश पाठवला. सुखद धक्का देणारा मा.मुख्यमंत्री महोदयांचा फोन आला. विश्वासराव मला या नवीन वर्षाची सुरुवात माझ्या मुंबई पोलीस दलातील बहाद्दर जवानांसोबत करायची आहे. रात्रभर तुम्ही काम करून थकाल. मी दुपारी एक वाजता येतो, असे मुख्यमंत्री फोनवर म्हणाल्याचं नांगरे पाटलांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व विश्वास नांगरे पाटील यांच्यातील 31 डिसेंबर रोजी रात्री झालेल्या संभाषणाची बातमी सर्व माध्यमांत प्रकाशित होत असतानाच भाजप नेते व माजी खासदार निलेश राणे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. काय बातमी पेरली आहे… हे मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांचे फोन उचलत नाही, शिवसैनिकांना फाट्यावर मारतात ती व्यक्ती मध्यरात्री एका मेसेजचं उत्तर देते हे अतिशयोक्ती आहे. PR टीमने कितीही उचलून धरलं तरी लोकं दूध खुळी नाही, आणि केलं जरी असेल तरी ते त्यांचं काम आहे, महाराष्ट्रावर उपकार नाही, असे ट्विट निलेश राणे यांनी केले आहे.