मुंबई – उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून सुरू करण्यात आलेल्या नवीन पॉडकास्टच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांची एक मुलाखत घेण्यात आली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर तसेच शिंदे गटावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. यावरून आता भाजपचे नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. ‘महाराष्ट्राच्या जनमताशी ज्यांनी बेईमानी केली ते इमानदार कसे?’ असा सवालही आशिष शेलार यांनी केला आहे.
आशिष शेलार यांनी ट्वीट करत लिहिले की, “महाराष्ट्राच्या जनमताशी ज्यांनी बेईमानी केली ते इमानदार कसे? कितीही मुलाखती दिल्या तरी बेईमानीचे पुसणार नाहीत आता ते ठसे! ही कसली मुलाखत… ही तर जळजळ, मळमळ आणि अपचनाचे करपट ढेकर, स्वतः चा पक्ष, सरकार न सांभाळ्याच्या “कलंका”तून बाहेर पडण्याची धडपड!! भरलेला डालड्याचा डाबा उपयोगाला तरी येतो रिकामा डबा टमरेल ठरतो! एक काळ मुलाखतीतून वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे डागायचे ते असायचे काडतुस हल्ली सगळं फडतूस, फडतूस आणि फडतूस!!!”
महाराष्ट्राच्या जनमताशी ज्यांनी बेईमानी केली ते इमानदार कसे?
कितीही मुलाखती दिल्या तरी बेईमानीचे पुसणार नाहीत आता ते ठसे!ही कसली मुलाखत…
ही तर जळजळ, मळमळ आणि
अपचनाचे करपट ढेकर
स्वतः चा पक्ष, सरकार न सांभाळ्याच्या “कलंका”तून बाहेर पडण्याची धडपड!!भरलेला डालड्याचा डाबा…
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) July 26, 2023
यावेळी उद्धव ठकरे यांनी एनडीएच्या बैठकीवरही टीका केली आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, “बऱ्याच वर्षांनंतर या देशात एनडीए नावाचा अमिबा जिवंत आहे हे कळलं. आपली इंडिया नावाची आघाडी तयार झाली आहे. विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ नावाची एक आघाडी केलेली आहे त्याला उत्तर देण्यासाठी मोदींनी एनडीएची जेवणावळ घातली आणि 36 पक्षांना त्यांनी एकत्र केले. खरं म्हणजे त्यांना एवढे पक्ष एकत्र आणण्याची गरज नव्हती. त्यांच्या ‘एनडीए’मध्ये ईडी, इन्कम टॅक्स आणि सीबीआय हे तीनच पक्ष मजबूत आहेत.”
उद्धव ठाकरेंनी बंडखोरांवरही निशाणा साधला आहे. “जी माणसे मनानेच विकली गेली आहेत ती माणसं मला नकोच आहेत. जी माझ्या सभोवती अगदी मूठभर का असतील, पण निष्ठावान अशीच माणसं मला हवीत. कारण तीच खरी शक्ती असते. पसाभर गद्दार घेऊन फिरण्यापेक्षा मूठभर निष्ठावंत मला नेहमीच आवडतात,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.
दरम्यान, ‘सामना’चे कार्यकारी संपादक आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ‘आवाज कुणाचा’ पॉडकास्टमध्ये उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीचा पहिला भाग आज सकाळी आठ वाजता प्रसारित झाला आहे. तर दुसरा भाग उद्या 27 जुलै रोजी सकाळी 8 वाजता प्रसारित होणार आहे.