पुणे- मुंबई अथवा राज्यात कुठेही प्रत्येक नागरिकाला व्यवसाय करण्याची मुभा आहे. पण असे असताना दुकानांवर मराठी पाट्या लावण्यात कमीपणा काय आहे? असा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला. व्यावसायिकांनी इतर कोणत्याही भाषेत पाट्या लावाव्यात पण त्यात मराठीचाही समावेश असावाच, असे आग्रही प्रतिपादन पवार यांनी केले.
तळजाई टेकडी येथील कार्यक्रमप्रसंगी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पवार बोलत होते. पवार म्हणाले की, मुंबई किंवा राज्यात कुठेही दुकानांवर मराठी पाट्या असाव्यात असा आदेश मध्यंतरी राज्य सरकारने काढला होता. त्याविरोधात काही नागरिकांनी उच्च न्यायालयात याचिका केली होती. मात्र न्यायालयानेही मराठी ही महाराष्ट्राची मातृभाषा आहे, त्यामुळे तिचा वापर करायला हरकत काय आहे? असा प्रश्न उपस्थित केला. इतकेच नव्हे, तर त्यांना दंडही आकारला होता. त्यामुळे या नागरिकांना चपराक बसली. मुळात व्यावसायिकांनी हिंदी, इंग्लिश अशा कोणत्याही भाषेत पाट्या लावाव्यात, त्याला विरोध नाही. पण त्या पाट्यांवर मराठीचाही समावेश असायलाच हवा, आसा आग्रह पवार यांनी यावेळी केला.
मराठीला अभिजात दर्जा दिलाच पाहिजे…
शिवाजी महाराजांचे नाव घेता? मग मराठीला अभिजात दर्जा दिलाच पाहिजे. मराठी बोलणाऱ्यांची संख्या केवळ महाराष्ट्रातच नव्हे, जगात, देशात आहे. ही छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा आहे. राजकीय नेते त्यांच्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतात, मग मराठीला अभिजात दर्जाही दिलाच पाहिजे. केंद्र सरकारने याबाबत प्रयत्न केले पाहिजे, असे मत उपमुख्यमंत्री पवार यांनी व्यक्त केले.