उच्च न्यायालयाने केला आरबीआयला सवाल
नवी दिल्ली : देशात नोटा आणि नाण्यांमध्ये होणाऱ्या बदलावर आता उच्च न्यायालयाने प्रश्न उपस्थित केला आहे. नोटा आणि नाण्यांच्या आकारामध्ये वारंवार बदल करण्याचे कारण काय आहे असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाने आरबीआयला विचारला आहे. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधिश प्रदीप नंदराजोग आणि एन.एम. जामदार यांच्या खंडपीठाने नॅशनल असोसिएशन ऑफ ब्लांईंडच्या एका याचिकेवर सुनावणी करत असताना प्रश्न उपस्थित केला.
एनबीएकडून उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. या याचिकेत आरबीआयकडून वारंवार नोटांच्या आणि नाण्यांच्या विशीष्ट आकारांमध्ये करण्यात येणाऱ्या बदलांमुळे दृष्टीहीनांना यात अडचण निर्माण होत असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, याच याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने आरबीआयला नोटांच्या आणि नाण्यांच्या बदलाचे काय कारण आहे असा सवाल केला आहे. तसेच जगात असा कोणताही देश नाही ज्या देशात त्यांच्या चलनामध्ये एवढ्या लवकर बदल करण्यात येते असेही न्यायालयाने म्हटले. दरम्यान, नोटबंदीनंतर देशात आरबीआयने अनेकवेळा नोटा आणि नाण्यांमध्ये बदल केला आहे.