पुणे – मागील महापालिका निवडणूकीत पुणेकरांना सत्ताधारी भाजपने दिलेली आश्वासने पुर्ण झालेली नसल्याचा दावा करत; शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून सोशल मिडीयावर भारतीय जनता पक्षाला दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देण्यात येणार आहे. त्यासाठी सोशल मिडीयाच्या माध्यमातून राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून ” क्या हुआ तेरा वाद..’ ही प्रश्न मालिका सुरू करण्यात आली आहे. तसेच प्रश्नांच्या माध्यमातून भाजपच्या अपयशाचा पाढा वाचणार असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले.
जगताप म्हणाले, ‘पुणे महापालिकेत पुणेकरांनी भाजपला ऐतिहासिक बहुमत दिले होते. मात्र या बहुमताचा वापर पुण्याच्या विकासासाठी करणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात मात्र भाजपचे वायदे म्हणजे ‘बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात…’ या म्हणीप्रमाणे ठरले आहेत. भाजपच्या या ‘मुंगिरीलाल’च्या स्वप्नांनी जाणीव पुणेकरांना करुन देणे हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कर्तव्य आहे’.
‘पुणेकरांना 2017 च्या महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आश्वासनांची खैरात केली होती. मोफत बस सेवा, चकाचक आणि खड्डेमुक्त रस्ते, गतीमान प्रशासन अशी मोठी यादी भाजपने पुणेकरांसमोर वाचली होती. पुणेकरांनीही भाजपच्या पारड्यात मते टाकली, मात्र प्रत्यक्षात पुणेकरांचा भ्रमनिरास आणि विश्वासघात झाला. त्यामुळे पुणेकर या विश्वासघाताला आगामी निवडणुकीतून उत्तर देतील, हे स्पष्ट आहे’, असेही जगताप म्हणाले.