नवी दिल्ली – माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांनी केवळ दीर्घकाळ देशाचे नेतृत्व केले असे नाही, तर युद्धकालातही त्यांनी देशाचे समर्थ नेतृत्व केले, अशा शब्दात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी इंदिरा गांधी यांचे कौतुक केले. शांघाय सहकार्य संघटनेत आयोजित “सशस्त्र दलांमधील महिलांचा सहभाग’ या विषयावरील परिसंवादामध्ये 1971 च्या भारत पाकिस्तान युद्धाच्या संदर्भाने ते बोलत होते.
राजनाथ सिंह यांनी देशाच्या स्वातंत्र्य युद्धातील महान सेनानी झांशीच्या राणी लक्ष्मीबाई आणि देशाच्या प्रथम महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचाही आपल्या भाषणात गौरव केला. देशाच्या विकासात महिलांच्या सहभागाबद्दल भारताचा अनुभव खूपच सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले.
सशस्त्र दलांमधील महिलांच्या सहभागाबद्दल आग्रही असणे जसे न्याय्य आहे, त्याचप्रमाणे अन्य क्षेत्रातील महिलांचा वाढता सहबाग आणि देश उभारणीतील महिलांच्या योगदानाचीही दखल घेतली जायला हवी. या योगदानाचे समर्थन केले जायला हवे, असेही राजनाथ सिंह म्हणाले.
देशाच्या आणि नागरिकांच्या हक्कांसाठी सुरक्षेसाठी हातात शस्त्र घेतलेल्या अनेक महिलांची उदाहरणे आहेत. इंदिरा गांधी यांनी केवळ देशाचे नेतृत्व केले असे नाही, तर 1971 मध्ये पाकिस्तानविरोधातील युद्धात देशाला विजय मिळवून दिला. काळजी घेणे हे अनेक शतकांपासून भारताच्या महिलांचा स्वभाव आहे. देवी सरस्वती ज्ञान प्रदान करते, तर दुर्गा रक्षण करते, असे सांगून बारीतय लष्करात परिचारीका म्हणून गेल्या 100 वर्षांपासून महिला सक्रिय असल्याचेही राजनाथ सिंह यांनी निदर्शनास आणून दिले. आगामी काही काळात महिलांना प्रत्यक्ष युद्धभूमीवर जाण्यासाठी कायम कमिशन प्रदान केले जाणार असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.