नवी दिल्ली: आम्ही पाकिस्तानातील सर्व नागरीकांना भारताचे नागरीकत्व देऊ अशी जाहींर कबुली कॉंग्रेस पक्ष देऊ शकेल काय अशी विचारणा करीत कॉंग्रेसने तसे करून दाखवावे असे जाहीर आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल झारखंडमधील सभेत बोलताना केले होते त्यावर आज कॉंग्रेस नेत्यांकडून विरोधाच्या प्रतिक्रीया आल्या आहेत.
मोदींच्या या आव्हानाला नेमका अर्थ काय असा सवाल कॉंग्रेस नेते चिदंबरम यांनी उपस्थित केला आहे. जे लोक आधीच पाकिस्तानच नागरीक आहेत त्यांना भारताचे नागरिकत्व कशासाठी द्यायचे? असाही प्रश्न चिदंबरम यांनी मोदींना विचारला आहे. भारतातील तरूण पिढी आणि विद्यार्थी सेक्युलर, लिबरल, सहिष्णु तसेच मानवतावादी विचारांची कास धरीत असताना सरकार त्यांच्या या मुल्यांनाच आव्हान देत आहे काय असा प्रश्नही त्यांनी मोदींना विचारला आहे.
कॉंग्रेसचे आणखी एक नेते कपिल सिब्बल यांनीही आपल्या ट्विटर अकौंटवरून मोदींच्या या विधानावर प्रतिक्रीया देताना म्हटले आहे की पाकिस्तानी नागरीकांविषयी मोदींनी एवढे पछाडून जाण्याची गरज नाही त्याऐवजी त्यांनी भारतातीाल नागरीकांकडे लक्ष देऊन त्यांच्या समस्यांची सोडवणूक केली पाहिजे. भारतातील नागरीकांनी मोदींना त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी निवडून दिले आहे असे सिब्बल यांनी म्हटले आहे.