शाही इमामांनी केले संयम राखण्याचे आवाहन
नवी दिल्ली: केंद्र सरकारने अलिकडेच जो नागरिकत्व सुधारणा कायदा केला आहे त्याचा देशातील मुस्लिम नागरीकांवर काहीहीं परिणाम होणार नाही आणि या कायद्याचा भारतातील मुस्लिमांशी काही एक संबंध नाही असे नमूद करीत जामा मशिदीचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांनी देशातील मुस्लिम नागरीकांना सयंम राखण्याचे आवाहन केले आहे. एनआरसीवरून सध्या अस्थिरता माजवली जात असली तर त्याचाही कायदा अजून झालेला नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. लोकांना निदर्शने करून विरोध करण्याचा अधिकार असला तरी शांतता बिघडवली जाऊ नये असे आवाहनही त्यांनी केले आहे.
लोकशाही हक्कांसाठी आपल्याला आंदोलन करण्याचा अधिकार असला तरी आपण आपल्या भावना काबुत ठेवल्या पाहिजेत आणि संयम राखून आपला विरोध नोंदवला पाहिजे असे ते म्हणाले. हा कायदा पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान येथून भारतात आलेल्या मुस्लिमांसाठी अयोग्य आहे कारण त्यांना नागरिकत्वाच्या हक्कातून यातून वगळण्यात आले आहे. पण या कायद्याने देशात राहणाऱ्या मुस्लिमांचे काहीही नुकसान होणार नाही.त्यांच्या हिताला या कायद्यामुळे कोणतीही बाधा येत नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. नागरिकत्व कायदा आणि एनआरसी हे दोन वेगळे विषय आहेत. त्यामुळे त्यांची गल्लत केली जाऊ नये. एनआरसी ची घोषणा झाली असली तरी अजून त्याचा कायदा झालेला नाही. शेजारील देशातून भारतात आलेल्या मुस्लिमांना यात नागरिकत्व नाकारण्यात आले असले तरी त्यातून भारतीय मुस्लिमांची काहीही हानी होणार नाही हे लक्षात घेतले पाहिजे असेही त्यांनी एका संदेशात म्हटले आहे.