आंबेगाव तालुक्यातील बळीराजाचा सवाल
भात उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता
कापणीला आलेले भातपीक पूर्णतः गेले वाया
रमेश जाधव
रांजणी – आंबेगाव तालुक्यात यंदा परतीच्या पावसामुळे आलेल्या महापूरामुळे शेतातील पिके वाहून गेली. तालुक्याच्या आदिवासी पश्चिम भागात भाताची उभी पिके वाहून गेली. तर तालुक्यात शेतकऱ्यांनी पिकविलेली इतर अन्य पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अगोदरच बळीराजाला अस्मानी संकटाने मारले असताना शासनाने देऊ केलेली तुटपुंजी मदत काय कामाची नायं, ही रक्कम वर्षभर तरी पुरेल का? असा प्रश्न आता आंबेगाव तालुक्यातील बळीराजाला सतावू लागला आहे.
तालुक्यात चालू वर्षी भात पिकाबरोबरच अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे नुकसान झाले. वादळी वाऱ्यामुळे उस, भुईमूग, टोमॅटो आदी पिकांचे 50 टक्यापेक्षा अधिक नुकसान झाले. यंदा अस्मानी संकटामुळे बळीराजाचे कंबरडे मोडले आहे. पिकांच्या नुकसानीमुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे यंदा आदिवासी भागातील भात उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तांदळासह अन्नधान्याच्या किंमतीत यंदा वाढ होणार असल्याने जिरायती भागातील शेतकरी कुटुंबावर यंदा दुष्काळाचे सावट असणार हे मात्र तितकेच खरे.
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात बागायती शेती तर पश्चिम भागात पावसावर अवलंबून असलेली भातशेती. पश्चिम आदिवासी भागात सुमारे 6 हजार 300 हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड केली जाते. परंतू यंदा अतिवृष्टीमुळे या भागातील भात पीक मोठ्या प्रमाणात वाया गेले आहे. भात शेतीचे चित्र पाहिले तर निम्याहूनही कमी भाताचे उत्पादन झाल्याचे पहावयास मिळत आहे. यंदा आंबेगाव तालुक्यात जोरदार अतिवृष्टी झाल्यामुळे त्यामध्ये पिकाबरोबर जमीन, माती मोठ्या प्रमाणात वाहून गेली. परतीच्या पावसामुळे कापणीला आलेले भातपीक पूर्णत: वाया गेले.
हाता तोंडाशी आलेला घास अतिवृष्टीने हिरावला
यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील भाजीपाला, भुईमूग, ऊस, टोमॅटो या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तालुक्यात असलेल्या 143 गावातील शेतकऱ्यांच्या शेतीचे कधी नव्हे एवढे पहिल्यांदाच नुकसान पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. हाता तोंडाशी आलेला घास अतिवृष्टीने हिरावून नेला. शेतकऱ्यांच्या शेतपिकाच्या झालेल्या नुकसानीची पाहणी प्रशासकीय पातळीवरती अधिकाऱ्यांनी केली. नुकसानीचे पंचनामे करुन अहवाल शासन दरबारी पाठवला गेला. परंतू तुटपुंजी मदतीचे रक्कम शेतकऱ्यांना मिळाल्याने वर्षभर या तुटपुंज्या आर्थिक मदतीचा हातभार कसा लागणार हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे.
शासनाने जिरायती पिकांना हेक्टरी 8 हजार रुपये तर बागायती पिकांना हेक्टरी 18 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र शेतकऱ्यांना शासनाने देऊ केलेली मदत पुरेसी नसल्याचे मत अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे. अर्थात चालू वर्षी शेतात झालेल्या शेतपिकांचे नुकसानही मिळालेल्या मदतीने भरुन निघत नसल्याने शासनाने तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे.
– संदेश थोरात, प्रगतशील शेतकरी.