सांगली: पावसाचा जोर वाढत असल्याने पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा पुराचे संकट घोंगावत आहे. याच पार्श्वभूमीवर जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील स्वतः नदीकाठच्या गावात पोहोचले व त्यांनी नागरिकांना धीर दिला.
संभाव्य पुराचा धोका लक्षात घेता सांगली जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना बोटी दिल्या जात आहे. वाळवा तालुक्यातील वाळवा व शिरगाव या गावांना आज पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते बोटी प्रदान करण्यात आल्या. यावेळी मंत्री जयंत पाटील यांनी नदीकाठच्या गावांना भेट दिली व संभाव्य पूर परिस्थितीबाबत नागरिकांना स्वतः माहिती दिली.
सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. वारणा नदीला पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे. दरम्यान, धोक्याची पातळी गाठण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून काही ठिकाणी या पावसाचा फटका शेतीला बसला आहे.