- शिवनेरी, रायगड किल्ल्यांवरील कत्रांटी कर्मचाऱ्यांची सेवा केली होती खंडित
नारायणगाव – भारतीय पुरातत्व विभाग महाराष्ट्र द्रोही असून, शिवनेरी आणि रायगड किल्ल्यांच्या देखभाल दुरुस्ती आणि सुरक्षेसाठी असलेल्या कर्मचाऱ्यांची सेवा खंडित करण्याचा आदेश तातडीने रद्द करावा; अन्यथा शिवसेना स्टाईल दाखवून देऊ, असा इशारा उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी ट्विटरद्वारे शनिवारी (दि. 15) दिला होता. यानंतर मुंबई सर्कलचे अधिकारी खडबडून जागे झाले आणि संध्याकाळी थेट आदेशच रद्द केला, अशी माहिती उपनेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.
आढळराव म्हणाले की, छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ शिवनेरी आणि समाधीस्थळ किल्ले रायगड येथील देखभालीसाठी असलेल्या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा खंडित करण्याचे दुष्कृत्य पुरातत्व विभागाच्या मुंबई सर्कलने केले आहे. या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीसह किल्ल्याच्या देखभालीसह सुरक्षेचा प्रश्न निर्माण होणार आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तातडीने लक्ष घालण्याची विनंती केली होती. यानंतर तातडीने सूत्रे हालली आणि संध्याकाळी पुरातत्व विभागाचे अधिकारी डॉ. यादव यांनी स्वतः काढलेले आदेश रद्द केल्याचे पत्र संध्याकाळी जारी केले असल्याचे त्यांनी नमूद केले.
करोनाच्या सुरुवातीच्या काळतही असाचा प्रकार केला होता. त्यानंतर शुक्रवारी (दि. 14) मुंबई सर्कलचे डॉ. राजेंद्र यादव यांनी पुन्हा आदेश काढत कामगरांची सेवा खंडीत केली होती. याबाबत तातडीन ट्वीटरद्वारे इशारा दिल्याने ते नरमले. जर पुन्हा असा खोडसाळ पणा केल्यास आम्ही मुंबईतील कार्यालयात जाऊन त्यांना काळे फासू आणि पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना शिवनेरी रायगडवर पाऊल ठेऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.
शिवनेरी किल्ल्यासाठीचे 23 कोटी तातडीने द्या
शिवनेरी किल्याच्या संवर्धन आणि विकास प्रकल्पासाठी यंदाच्या आर्थिक वर्षासाठी मंजुर करण्यात आलेले 23 कोटींचा निधी करोना संकटामुळे अद्याप मिळालेला नाही. हा निधी तातडीने मिळावी अशी मागणी मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पुणेभेटी दरम्यान पत्राद्वारे केली आहे.