कोलकाता – प. बंगालमध्ये भारतीय जनता पार्टी आणि तृणमूल कॉंग्रेस यांच्यात घमासान सुरू असली आणि सत्ता काबिज करण्यासाठी भाजप प्रयत्नांची पराकाष्ठा करत असला तरी या राज्यातील जनतेच्या मनावर अजुनही ममतांचेच राज्य चालते असा दावा एबीपी सी वोटरने केला आहे. ममतांना 2016 च्या तुलनेत थोडे नुकसान सहन करावे लागेल. मात्र पुन्हा सत्ता संपादन करण्यात त्या यशस्वी होतील असा दावा एबीपीने केला आहे.
त्यांच्या सर्वेक्षणानुसार ममतांच्या पक्षाला गेल्या विधानसभा निवडणुकांच्या वेळी 44.9 टक्के मते मिळाली होती. त्यात यंदा घट होणार आहे. तृणमूलला 43.4 टक्के मते मिळतील आणि पुन्हा ममता यांचीच मुख्यमंत्रिपदावर वर्णी लागणार आहे. या पदासाठी कोणाला पसंती देणार असा कौल अजमावण्यात आला होता. त्यातही जनतेने ममतांच्या पारड्यातच मत टाकले असल्याचे निष्पन्न होते आहे.
या सर्वेक्षणानुसार भाजपही जोरदार मुसंडी मारताना दिसतो आहे. या पक्षाला गेल्या निवडणुकीच्या वेळी दहा टक्क्यांच्या आसपास मते मिळाली होती. मात्र आता ती टक्केवारी तब्बल 39 टक्क्यांपर्यंत पोहोचणार असल्याचा दावा केला जातो आहे. याचा अर्थ ममतांच्या पक्षापेक्षा केवळ चार टक्के कमी मते भाजपला मिळताना दिसत आहेत.
डावे आणि कॉंग्रेस आघाडीचे पानिपत होणार असल्याचा दावा हे सर्वेक्षण करते आहे. त्याचे कारण गेल्या निवडणुकीत या दोन्ही पक्षांना मिळून 38 टक्क्यांच्या आसपास मते मिळाली होती. ती टक्केवारी यंदा 12 टक्क्यांपर्यंत खाली येणार असल्याचे भाकित वर्तवण्यात आले आहे.
जागांच्या भाषेत सांगायचे झाले तर तृणमूलला गेल्या वेळी 211 जागा मिळाल्या होत्या. यंदा त्या पक्षाला 150 ते 160 च्या दरम्यान जागा मिळतील. तर 294 सदस्य संख्या असलेल्या प. बंगाल विधानसभेत भाजप 98 ते 114 जागांपर्यंत मुसंडी मारणार असल्याचे अंदाज वर्तवले जात आहेत. गेल्या वेळी भाजपचे केवळ तीन आमदार होते. डावे कॉंग्रेस आघाडीला 23 ते 30 जागा देण्यात आल्या आहेत. गेल्या वेळी त्यांची संख्या 76 होती.