कोलकाता – पश्चिम बंगालमध्ये ममतादीदींची जादू कायम असल्याचे चित्र आहे. त्यांच्यावरील हल्ल्यानंतर त्यांना मतदारांची सहानुभूती मिळताना दिसत आहे. पश्चिम बंगालमध्ये ओपिनियन पोलच्या अंदाजानुसार ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेसची राज्यात सत्ता येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
तर, 3 आमदार असलेला भाजप प्रमुख विरोधी पक्ष होऊ शकतो. टीएमसीला 43.1 टक्के, भाजपला 38.8 टक्के, कॉंग्रेस आणि डावे पक्ष यांच्या आघाडीला 11.7 टक्के मतं मिळू शकतात तर इतरांना 6.4 टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे. ओपिनियन पोलनुसार मुख्यमंत्री पदाची पहिली पसंती ममता बॅनर्जी (51.8) यांना आहे.
अर्ध्यापेक्षा जास्त मतदारांचा कौल ममता बॅनर्जींना आहे. तर भाजपचे दिलीप घोष (24.2), मिथुन चक्रवर्ती (4.6) आणि शुभेंदू अधिकारी (5.2) यांना ममता बॅनर्जी यांच्या तुलनेत कमी पसंती आहे.
पश्चिम बंगालच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचाच फॅक्टर चालणार असल्याचे किमान या पोलमध्ये तरी स्पष्ट झाले आहे.
ममता बॅनर्जी यांचा फॅक्टर चालेल, असे 39.7 टक्के, नरेंद्र मोदी फॅक्टर चालेल असे 28.6 , मुस्लीम फॅक्टर 6.3 , भ्रष्टाचाराचा मुद्दा 14.4 टक्के आणि कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा चालेल, असे 6.2 टक्के लोकांना वाटते.
नंदीग्राममध्ये काय होणार?
ममता बॅनर्जी या नंदीग्राम विधानसभा मतादारसंघातून निवडणूक लढवत आहेत. तिथे त्यांच्यासमोर एकेकाळचे सहकारी शुभेंदू अधिकारी यांचे आव्हान आहे. नंदीग्राममध्ये 50 टक्के लोकांची पसंती ममता बॅनर्जी यांना असून 40.7 टक्के शुभेंदू अधिकारी आणि मिनाक्षी मुखर्जी यांना 9.3 टक्के लोकांची पसंती आहे.