बेंगळुरू – कर्नाटकातील काँग्रेस पक्षाच्या विधान परिषद सदस्या वीणा अचय्या यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून फिल्ड मार्शल के. एम. करिअप्पा आणि जनरल के, एस. थिमय्या यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार मरणोत्तर देण्यात यावा अशी मागणी केलेली आहे.
त्यावर योग्य ती कार्यवाही करण्यासाठी राष्ट्रपती भवनाकडून हे पत्र पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवण्यात आले आहे. यासंदर्भातील पत्र मिळाल्याची पोच राष्ट्रपती भवनाकडून 6 फेब्रुवारी 2021 रोजी अचय्या यांना मिळाली आहे.
राष्ट्रपतींच्या सचिवालयातील विशेष अधिकारी जगन्नाथ श्रीनिवासन यांनी आमदार अचय्या यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, त्यांच्या पत्रावर योग्य ती कार्यवाही करण्यासाठी ते पत्र पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवण्यात आले आहे.
फिल्ड मार्शल करिअप्पा आणि जनरल थिमय्या हे दोघेही कर्नाटकातील कोडुगू जिल्ह्यातील रहिवासी होते. दोघांना भारतरत्न देण्यात यावा ही मागणी अनेक वर्षांपासून केंद्र सरकारकडे पडून आहे.
लष्करप्रमुख बिपीन रावत यांनीदेखील फिल्ड मार्शल करिअप्पा यांना भारतरत्न देण्याच्या सूचनेला अनुमोदन दिले आहे. करिअप्पा हे भारतील लष्कराचे कमांडर इन चीफ होते तर जनरल थिमय्या 1957 ते 1961 या काळात लष्करप्रमुख होते.
मागील महिन्यात मडिकेरी येथील जनरल थिमय्या स्मृती संग्रहालयाचे उद्घाटन करण्यासाठी राष्ट्रपती कोविंद आले होते. त्यावेळी आमदार अचय्या यांनी त्यांना या दोन सेनानींना भारतरत्न देण्याबाबत स्मरणपत्र दिले होते.