बहरमपूर (पश्चिम) – लोकसभा निवडणुकीत तृणमुल कॉंग्रेसने पश्चिम बंगालमध्ये स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला असल्याने इंडिया आघाडीला पश्चिम बंगालमध्ये मोठा धक्का बसल्याचे सांगितले जात होते. तथापी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांचा पक्ष पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमुल कॉंग्रेस सोबत लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपावर चर्चा करत असल्याची माहिती दिली आहे.
या चर्चेतून जागा वाटपाचा तिढा लवकरच संपुष्टात येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. राहुल गांधी यांनी गुरुवारी रात्री पश्चिम बंगालमध्ये पक्षाच्या ‘डिजिटल मीडिया वॉरियर्स’शी संवाद साधताना ही टिप्पणी केली.
राज्यात काँग्रेससाठी लोकसभेची एकही जागा सोडण्याची इच्छा नसतानाही काँग्रेस तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांना महत्त्व का देत आहे, असे विचारले असता गांधी म्हणाले, ना ममताजी असे म्हणाल्या आहेत, ना तृणमुल काँग्रेस आघाडीतून बाहेर पडली आहे. ममता बॅनर्जी इंडिया आघाडीतच असून आमची जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. आमच्यात जे काही विषय आहेत, त्यावर चर्चेने मार्ग काढला जाईल असे ते म्हणाले.
गुरुवारी, बॅनर्जी म्हणाल्या होत्या की आम्ही काँग्रेससोबत जागा वाटपाच्या व्यवस्थेसाठी उत्सुक होतो, परंतु या निवडणुकीत कॉंंग्रेसने सीपीआय(एम) सोबत हातमिळवणी केली त्यामुळे आम्ही लोकसभेत स्वबळावर लढण्याचे ठरवले आहे. तथापि पश्चिम बंगालमध्ये आम्ही वेगवेगळे लढणार असलो तरी आमचा पक्ष इंडिया आघाडीतच राहील आणि निवडणुकीननंतर आम्ही इंडिया आघाडी सोबत जाऊ असे त्यांनी म्हटले होते. त्यामुळे त्या आघाडीबाबत संभ्रमाची स्थिती निर्माण झाली होती. पण राहुल गांधी यांच्या आजच्या विधानानंतर चित्र बऱ्यापैकी स्पष्ट झाले आहे. निवडणुकीनंतर टीएमसी इतर प्रादेशिक पक्षांसोबत काम करेल, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.